मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला गर्व : जे.पी.नड्डा

21 Jul 2019 17:16:03


स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे वीर सावरकर यांना अभिवान करताना उपस्थित मान्यवर


मुंबई : "आम्हाला मोदी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात गर्व वाटतो. भाजप सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांद्वारे जनजागृती, प्रचार प्रसार केल्यानंतर जनतेला भाजप सदस्यत्व स्वीकारण्यासाठी आवाहन करून संगठन पर्व अभियान यशस्वीपणे पूर्णत्वास नेऊ"
, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले.


 

 

कार्यकर्ते आमचे बळ

ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर भूमी महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दिलं त्यांच्याबद्दल मी आभार मानतो."
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, बहुतांश पक्षांकडे नेते आहेत मात्र, त्यांची नियत नाही. काही जणांकडे नियत आहे मात्र, निती नाही. मात्र, भाजपकडे नेतेही आहेत. नीति आहे, नियतही आहे, वातावरण आहे, कार्यक्रम आहे आणि कार्यकर्तेही आहेत, हे आमचे बळ आहे, असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्याना दिला.


 

 

१० कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य

भाजपकडे सध्या ११ कोटी सदस्य आहेत. यापुढे आता भाजपने १० कोटी सदस्यांची नोंदणीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ही आमची ताकद आहे आणि हीच आमची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपादन नड्डा यांनी केले. जे. पी. नड्डा यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्रभारी सरोज पांडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार,
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर होते. त्यानंतर दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून वंदन केले.



 

दानवेंची कॉंग्रेसवर टीका

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर आपल्या खास शैलीत टीका केली. दानवे म्हणाले, "काँग्रेसमध्ये कुणी अध्यक्ष व्हायला तयार नाही. गोव्यात १० आमदार फुटले, कर्नाटकचे आमदार फुटले, पण कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनामा दिला तर भाजप आमदारांचा दोष काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशभरात काँग्रेसला गळती लागली आहे. त्यामुळे पक्षसंघटन कमकूवत झाले आहे. आता कार्यकर्ते ऐकणार तरी कुणाचे, कारण सगळे एकाच वजनाचे आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला. काँग्रेसमध्ये जे चांगले आहेत. त्यांना पक्षात घ्या आणि भाजपाच्या कामाला लावा, असेही दानवे म्हणाले. काँग्रेस म्हणत होत, ‘गरिबी हटावपण आता गरिबांनी ठरवलं की काँग्रेसला हटवायचेआणि गरिबांचा पंतप्रधान करायचे. आज गरिबांचे पंतप्रधान झाल्याचे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0