इदी, एन्टेबी आणि वारांगनेव नृपनीति

12 Jul 2019 20:55:02

 

 
नृपनीति म्हणजे राजकारण हे वारांगनेप्रमाणे असतं, असं आपले प्राचीन सुभाषितकार म्हणून गेले आहेत, ते किती खरं आहे, याचा प्रत्यय काही कथांमधून पुन्हा पुन्हा येत असतो.
 

१९७६ सालचा जून महिना होता. २७ तारखेला दुपारी १२ च्या सुमारास एअर फ्रान्सच्या एका विमानाने ग्रीसमधील अथेन्स विमानतळावरून उड्डाण केले. ते पॅरिसकडे निघाले. मुळात हे उड्डाण इस्रायली राजधानी तेल अवीव ते पॅरिस असे होते. अथेन्स विमानतळ सोडल्यावर थोड्याच वेळात प्रवाशांपैकी चारजण उठले. दोघे वैमानिकाच्या कक्षात घुसले. पिस्तुलाच्या धाकाने त्यांनी वैमानिकाला विमान लिबियाकडे वळवण्यास भाग पाडले. उरलेल्या दोघांनी प्रवाशांवर पिस्तुल रोखून त्यांना विमानाचे अपहरण करण्यात येत असल्याचा इशारा दिला. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास विमान लिबियाच्या वेगाझी विमानतळावर उतरलं. तिथे इंधन भरल्यावर ते पुन्हा उडालं आणि युगांडा देशाची राजधानी कंपाल येथील ‘एन्टेबी’ या विमानतळावर उतरलं. विमानात २४८ प्रवासी आणि १२ कर्मचारी मिळून २६० लोक होते. यातील चार अतिरेक्यांमध्ये दोघेजण ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (पीएलओ) या संघटनेचे एक पिल्लू, ‘पॉप्युलर फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ पॅलस्टाईन’ (पीएफएलपी)चेसदस्य होते. दुसरे दोघे ‘रेव्होल्युशनरी सेल्स’ या जर्मन अतिरेकी संघटनेचे सदस्य होते.

 

एन्टेबी विमानतळावर उतरल्यावर या चौघांना आणखी चार अतिरेकी येऊन मिळाले. याचा अर्थ स्पष्ट होता. युगांडाचे अध्यक्ष इदी अमीन यांचा या अपहरणाला पूर्ण ‘आशीर्वाद’ होता. अतिरेक्यांनी प्रवाशांची ‘ज्यू’ व ‘बिगर ज्यू’ अशी विभागणी केली. १०५ प्रवासी ज्यू होते. त्यांना ओलीस धरण्यात आलं आणि इतरांना सोडून देण्यात आलं. वैमानिक आणि कर्मचारी यांनाही सोडून देण्यात आलं. पण, वैमानिक मायकेल बाकोस याने ठाम नकार दिला. या विमानातला प्रत्येक प्रवासी पॅरिसला पोहोचेपर्यंत वैमानिक म्हणून माझं कर्तव्य संपत नाही. त्यामुळे या १०५ प्रवाशांना सोडून मी जाणार नाही,” असं तो म्हणाला. त्याच्या अकराही सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याच्या म्हणण्याला साथ दिली. अतिरेक्यांनी इस्रायल सरकारला धमकी दिली की, ‘खुद्द इस्रायलच्या तुरुंगात असलेले ४० पॅलेस्टाईनी अतिरेकी आणि केनिया, फ्रान्स, स्वित्झर्लंड व पश्चिम जर्मनी यांच्या ताब्यात असलेले आणखी १३ अतिरेकी अशा सर्वांची सुटका ताबडतोब करा, नाहीतर १ जुलैपासून क्रमाक्रमाने ओलिसांना ठार मारण्यास सुरुवात करू.” 
 
 
बातम्या जगभर पसरल्या. सगळ्या जगाचाच श्वास जणू रोखला गेला. भारतात यावेळी इंदिरा गांधींची (कु)प्रसिद्ध आणीबाणी सुरू होती. वृत्तपत्र ‘सेन्सॉर’ होत असल्यामुळे खऱ्या बातम्या समजत नव्हत्या. ‘इंदिरा, संजय आणि त्यांचे अनुशासनपर्व’ यांच्या बातम्या सतत वाचून लोक कंटाळले होते. राजनैतिकदृष्ट्या इदी अमीनचे आणि भारताचे संबंध १९७२ पासूनच बिघडलेले होते. त्यामुळे या अपहरणाच्या बातम्या फारशा ‘सेन्सॉर’ न होता येऊ शकल्या. यानंतर जो काही घटनाक्रम झाला, तो म्हणजे राजकारण आणि रणांगण या दोन्ही क्षेत्रात ‘गनिमी कावा’ कसा वापरावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. १ जुलैला इस्रायलने अतिरेक्यांना कळवलं की, आम्हाला अखेरची मुदत ४ जुलैपर्यंत वाढवून द्या, अतिरेक्यांनी इदी अमीनशी सल्लामसलत करून ही मागणी मान्य केली. ३ जुलै रोजी इस्रायली कमांडोजनी ‘मेजर जनरल येकुतेल आदम’ याच्या नेतृत्वाखाली एन्टेबी विमानतळावर अत्यंत धाडसी असा छापा घातला. अचूक माहिती, प्रत्येक क्षण व प्रत्येक हालचाल यांचं काटेकोर नियोजन आणि छाप्यात सामील असलेल्या १०० कमांडोंची अपूर्व हिंमत यांनी चमत्कार घडवला. आठ पैकी सहा अतिरेकी ठार झाले. ओलिसांपैकी तीनजण ठार व १० जण जखमी झाले. युगांडाचे ४५ सैनिक ठार झाले, तर इस्रायली कमांडोजपैकी फक्त एकजण ठार झाला. त्याचं नाव लेफ्टनंट कर्नल योनातन नेतान्याहू. सध्याचे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा तो मोठा भाऊ.
 

सगळं जग आश्चर्याने थक्क झालं. सर्वत्र इस्रायलचं अपार कौतुक झालं आणि सर्वत्र इदी अमीनची प्रचंड नाचक्की झाली. पॅलेस्टाईनी अरबांनी विमान पळवलं, यात काही नवल नव्हतं. लिबियाने विमानात इंधन भरू दिलं, यातही फारसं नवल नव्हतं. कारण, लिबियाचा हुकूमशहा मुहम्मद गद्दाफी हा अरबच होता. पण, अरब आणि इस्रायलच्या दुश्मनीत इदी अमीनने अरबांची बाजू का उचलावी, हे कुणाला उलगडत नव्हतं. भारतात तर इदी अमीन अगोदरच अप्रिय झाला होता. कारण, १९७३ साली त्याने किमान ८० हजार आशियाई लोकांना युगांडातून हाकलून दिलं. यातले बहुसंख्य भारतीय आणि त्यातही गुजराती व्यापारी होते. गुजराती भाषेत ‘गांडा’ म्हणजे ‘वेडा.’ त्यामुळे या घटनेनंतर भारतात, विशेषत: गुजरातमध्ये आणि मुंबईत ‘इदी अमीन’ आणि ‘यू-गांडा’ या शब्दांना वेगळा संदर्भ प्राप्त होऊन ‘इदी अमीन’ची भरपूर कुचेष्टा झाली. ते कसंही असो. १९७६ साली ज्या इदी अमीनला इस्रायलने अशा प्रकारे अतिशय कणखरपणे हाताळला, त्या इदी अमीनला सत्ता हासिल करायला १९७१ साली इस्रायलनेच मदत केली होती. राजकारण हे किती विचित्र असतं, इथे शत्रू आणि मित्र कसे सतत बदलत असतात, याचं हे उदाहरण आहे.

 
‘युगांडा’ हा मध्य आफ्रिकन देश ही ब्रिटिश वसाहत होती. इदी अमीनचा बाप आंद्रिआस न्याबिरे हा ‘काकवा’ या टोळीतला होता. १९१० साली त्याने कॅथलिक धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला आणि ‘अमीन’ हे आडनाव घेतलं. इदीचा जन्म १९२५ सालचा. त्याची आई वनौषधींची उत्तम जाणकार होती. इतकंच नव्हे, तर युगांडाच्या ‘बुगांडा’ या राजघराण्याची राजवैद्य होती. इदी अमीन ब्रिटनच्या ब्रिटिश कलोनियल आर्मीच्या ‘किंग्ज आफ्रिकन रायफल्स’ या पथकात १९४६ साली साधा स्वयंपाकी म्हणून दाखल झाला. पण, झपाट्याने चढत १९५४ साली तो ‘इफेंडी’ म्हणजे अधिकारी झाला. त्यावेळी कुणाही काळ्या माणसाला मिळू शकणारं हे सर्वोच्च लष्करी पद होतं. १९६२ साली युगांडा स्वतंत्र झाला. पण, त्याच्या वर्षभर अगोदर म्हणजे १९६१ साली ब्रिटिशांनी, कलोनियल आर्मीतील काळ्या लोकांना ‘कमिशन्ड ऑफिसर’ म्हणजे गोऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणेच अधिकार द्यायला सुरुवात केली होती. युगांडाच्या सैन्यातले फक्त दोनच ‘इफेंडी’ अधिकारी ‘कमिशन्ड ऑफिसर्स’ बनून ‘लेफ्टनंट’ हा हुद्दा मिळवते झाले. त्यातला एक इदी अमीन होता.
 

लगेचच युगांडा स्वतंत्र झाला. इदी अमीनचा झपाट्याने उत्कर्ष होत गेला. युगांडाच्या सैन्यामध्ये भरती करण्याचे काम त्याच्याकडे आले. आपली स्वत:ची ‘काकवा’ ही टोळी, आपल्या आईची ‘कागबारा’ ही टोळी, युगांडाच्या उत्तरेला असणाऱ्या सुदान या देशातली ‘न्युबियन’ या नावाने ओळखली जाणारी टोळी यांच्यातून त्याने भरपूर सैन्यभरती केली. हे करताना त्याने, आपण भरती केलेले सैनिक आपल्याशी एकनिष्ठ राहतील, याची पुरेपूर काळजी घेतली. मग एक दिवस त्याचा उजाडला. 25 जानेवारी, 1971 या दिवशी ‘रेडिओ युगांडा’ने जाहीर केलं की, अध्यक्ष मिल्टन ओबोरे यांची सत्ता संपुष्टात आली असून, जनरल इदी अमीन हे आता नवे राष्ट्रप्रमुख आहेत. ब्रिटनची युगांडावरची राजनैतिक सत्ता संपली असली तरीही व्यापारासाठी दोघेही एकमेकांशी चांगले संबंध ठेवून होते. त्यामुळे जगभरच्या राजकीय नेत्यांनी असा अंदाज बांधला की, ओबोरे यांची धोरणं न पटल्यामुळे ब्रिटननेच इदी अमीनला हाताशी धरून हे सत्तांतर घडवून आणलं असावं. अर्थात, अलिखित राजकीय संकेतानुसार जाहीरपणे कुणी तसं म्हटलं नाही. पण, युगांडाची राजधानी कंपालमधील ब्रिटिश राजदूत रिचर्ड स्लेटर याला धक्का बसला. लंडनमधून परराष्ट्रमंत्री डग्लस होम याच्याकडून स्लेटरकडे याबाबत विचारणा होऊ लागली. स्लेटरने कंपालमधील इस्रायली लष्करी सल्लागार कर्नल बार लेव याला गाठलं आणि मग सगळा उलगडा झाला.

 

यात इस्रायली सैन्याचा मोठा सहभाग होता. युगांडा स्वतंत्र झाल्या झाल्या स्वतः इदी अमीन काही काळ इस्रायलमध्ये जाऊन विशेष प्रशिक्षण घेऊन आला होता. युगांडाचा शीवशेजारी सुदान हा अरब देश आहे. त्यामुळे इस्रायलविरोधी अरबांच्या फळीत सुदानही होताच. युगांडाला मदत करण्यात इस्रायलचा हेतू हा की, युगांडाने सुदानमधील सरकारविरोधी बंडखोरांना मदत देत राहावं. इदी अमीनने हे काम आनंदाने पत्करलं. त्यामुळे तो इस्रायलचा दोस्त झाला. त्याला युगांडाची सत्ता हवी होती. योग्य संधी मिळताच त्याने आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याच्या जोरावर मिल्टन ओबोरे सरकार उलथवलं. इस्रायलचा यात काहीच तोटा नव्हता. त्यामुळे त्याने अमीनला मदत केली. ‘इस्रायली मिलिटरी अॅटेशे कर्नल बार लेब’ यांच्याकडून हे सगळं वृत्त कळल्यावर ते लंडनला कळवलं. परराष्ट्रमंत्री डग्लस होम याने त्याला जे उलट उत्तर पाठवलं ते राजनीतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मिल्टन ओबोरेचं लोकशाही सरकार उलथवून इदी अमीन हा लष्करी हुकूमशहा सत्तेवर आला. याबद्दल डग्लस होमला, ब्रिटन या लोकशाहीची जननी असणाऱ्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्याला, काडीचंही दु:ख असल्याचं या संदेशात दिसत नाही. डग्लस होम म्हणतो, “पंतप्रधान एकंदर घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत. आपल्या शस्त्रास्त्रांची विक्री करण्याची संधी साधण्याकडे लक्ष दे.

 

अर्थात, ही संधी पहिल्यांदा इस्रायलने साधली. युगांडाचे नवे सत्ताधारी म्हणून इदी अमीन यांनी लगेचच आपला पहिला विदेश दौरा इस्रायलला केला. पंतप्रधान गोल्डा मायर यांनी त्यांचे स्वागत केलं. पण, इस्रायलकडून युगांडाला हव्या असलेल्या शस्त्रास्त्रांची त्यांनी सादर केलेली भलीमोठी यादी पाहून गोल्डा मायर ‘चाट’ पडल्या होत्या, असं म्हणतात. यानंतर दुसरा विदेश दौरा अमीन यांनी ब्रिटनचा केला. लंडनला त्यांचं भव्य स्वागत झालं. शस्त्रास्त्रांचा सौदा बहुधा ब्रिटनला हवा तसा झाला. कारण, नंतर राणीने बकिंगहॅम राजवाड्यात शाही मेजवानी देऊन अमीन यांचा सत्कार केला होता. ब्रिटिश परराष्ट्र खात्याच्या अलीकडेच जाहीर झालेल्या कागदपत्रांमधून ही चित्तरकथा बाहेर पडली आहे.

 

नृपनीति म्हणजे राजकारण हे वारांगनेप्रमाणे असतं, असं आपले प्राचीन सुभाषितकार म्हणून गेले आहेत, ते किती खरं आहे, याचा प्रत्यय अशा कथांमधून पुन्हा पुन्हा येत असतो.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
Powered By Sangraha 9.0