जयकुमार रावलयांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय

07 Jun 2019 17:17:27


 


संसदीय कामकाज मंत्रालयाची अतिरिक्त जबादारी विनोद तावडेंवर


मुंबई : गिरीश बापट यांची पुण्याच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडील पालकमंत्री व मंत्रिपदाच्या जबाबदारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. गिरीश बापट यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालय, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय व पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबादारी होती. त्यामुळे त्यांच्याकडील असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी जयकुमार रावल यांना देण्यात आली असून संसदीय कामकाज मंत्रालयाची अतिरिक्त जबादारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भाजपाध्यक्ष अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीला मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयीची चर्चा झाल्याची कुजबुज होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची दिल्लीत बढती झाल्याने महाराषट्राचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण या चर्चेला मात्र उधाण आले आहे.

 

पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदांमध्ये फेरबदल केले आहेत. या नवीन फेरबदलानुसार पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची निवड झाली. तर जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज शासनाने परिपत्रक काढून पुण्याच्या पालकमंत्रीपदावर चंद्रकांतदादा पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0