नवी दिल्ली : आज 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' आहे. २१ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो. भारताने १९९८मध्ये पोखरण येथे अण्वस्त्रचाचणी करून इतिहास घडवला होता. ११ मेची चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी पुन्हा दोन अण्वस्त्रांच्या चाचण्या भारताने घेतल्या होत्या.
या यशस्वी चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले होते. या मिशनला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव देण्यात आले होते. या चाचणीचे सांकेतिक नाव होते, 'ऑपरेशन शक्ती.' एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदम्बरम आणि अनिल काकोडकर हे या चाचण्यांचे शिल्पकार होते.
पंतप्रधांनानी दिला आठवणींना उजाळा
याच दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून शुभेच्या दिल्या आहेत. १९९८ साली झालेल्या अण्वस्त्रचाचणीमध्ये सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचा आम्हाला गर्व असल्याचे ते म्हणाले. आपल्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी आज भारत देश मजबुत आणि सुरक्षित झाला असल्याचे सांगत त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat