तापली मुंबई ! मुंबईचा पारा चाळीशी पार...

25 Mar 2019 18:54:48



मुंबई : होळीनंतर मुंबईत तापमानाचा पारा वाढू लागला आहे. रविवारी ३७ अंश सेल्सिअसपर्यंत असणाऱ्या तापमानाने सोमवारी दुपारी ४० अंश सेल्सिअस तापमान गाठले. मंगळवारीदेखील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत दुपारी १२ वाजताचे तापमान ४० अंश सेल्सिअस असल्याचे वृत्त 'स्कायमेट'ने दिले. आजचे तापमान वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा आणखी १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारपासूनच मुंबईकरांना तापमानातील फरक जाणवायला लागला आहे. मुंबईत गेल्या संपूर्ण आठवड्यात किमान तापमान सांताक्रूझ येथे २१.२ तर कुलाबा येथे २३ अंशांवर होते. मुंबईचे कमाल तापमान शनिवारी ३४.१ अंशांपर्यंत पोहोचले. यात रविवारी लक्षणीय वाढ झाली. सांताक्रूझ कमाल ३७.८ आणि किमान २२.५, तर कुलाबा येथे कमाल ३३.५ तर कमाल २४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच वाढलेल्या तापमानाने मुंबईकरांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थतेची जाणीव झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात तापमान २ ते ३ अंशांनी वाढले आहे. पूर्वेकडील उष्ण वार्‍यांनी मध्य महाराष्ट्रसह मुंबई परिसराचाही पारा वाढला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0