विदर्भाने दुसऱ्यांदा कोरले 'रणजी'वर नाव

07 Feb 2019 12:07:13



नागपूर : रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रचा ७८ धावांनी दारुण पराभव करत दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले. आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीपुढे सौराष्ट्रचा डाव पत्त्यासारखा कोसळला. सौराष्ट्र दुसऱ्या डावात १२७ धावांत गारद झाला. सौराष्ट्रच्या विश्वराज जडेजाने सर्वाधिक ५२ धावा केल्या. पहिल्या डावात ५ फलंदाजाना बाद करणाऱ्या आदित्यने दुसऱ्या डावात धारदार गोलंदाजी करत ६ गडी बाद केले.

 

दुसऱ्या डावात विदर्भाने सौराष्ट्रपुढे २०६ धावांचे आव्हान दिले होते. पण त्यांचा डाव १२७ धावात गारद झाला. अक्षय वाखरेने ३७ धावात ३ गडी बाद करत सुरेख साथ दिली. दुसऱ्या डावात उमेश यादवाला एकमेव गडी बाद करता आला. विदर्भाने पहिल्या डावात आदित्य कर्णेवारच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ३१२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्राने पहिल्या डावात स्नेल पटेलच्या शतकीय जोरावर ३०७ धावांपर्यंत मजल मारली. आदित्य सरवटे आणि आणि अक्षय वाखरेच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भाने पहिल्या डावात ५ धावांची छोटी आघाडी घेतली.

 

दुसऱ्या डावात विदर्भच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी २०० धावांचा टप्पा गाठून दिला. अखेरीस २०० धावांवर विदर्भाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर सौराष्ट्राला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान देण्यात आले. चौथ्या दिवसअखेर सौराष्ट्रची अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. पाचव्या दिवशी विश्वराज जाडेजाने अर्धशतकी खेळी करत विदर्भाला एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एकाचीही साथ लाभली नाही. इतर फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे विदर्भाने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0