शहरातील 'अमर जवान' स्तंभाची दुरवस्था

18 Feb 2019 22:29:20



उल्हासनगर (शिवाजी वाघ) : एकीकडे पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जात असताना, उल्हासनगर प्रभाग समिती क्र. ३ समोर असलेला 'अमर जवान स्तंभ' मोडकळीस आला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांना त्याची डागडुजी करण्यास वेळ नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

 

उल्हासनगर क्र. ४ येथील प्रभाग समिती क्र. ३च्या कार्यालयासमोर आणि व्हिटीसी मैदानासमोर 'अमर जवान चौक 'असून या चौकात 'अमर जवान स्तंभ' उभारण्यात आला आहे. कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ संग्राम फाऊंडेशनच्या वतीने हा स्तंभ उभारण्यात आला आहे. या फाऊंडेशनचे देणगीदार आणि महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४मध्ये हा स्तंभ उभारला होता. या स्तंभासाठी खास राजस्थानमधून बंदुकीची प्रतिकृती मागविण्यात आली होती. मात्र, सध्या या विजय स्तंभाची फारच बिकट अवस्था आहे. त्यामुळे या स्तंभाची साफसफाई आणि डागडुजीकरिताही पालिका कर्मचाऱ्यांकडे वेळ नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. या संदर्भात प्रभाग समिती क्र. ३चे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

'हुतात्मांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

 

''अमर जवान स्तंभाच्या दूरवस्थेबाबत आम्ही प्रभाग समिती क्र. ३चे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व अन्य अधिकाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. अशा प्रकारे हुतात्म्यांच्या स्मारकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय नेतेदेखील याप्रकरणी तेवढेच जबाबदार आहेत. ते हुतात्म्यांच्या नावाने केवळ राजकारणच करतात”, असे दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया संग्राम फाऊंडेशनचे पदाधिकारी काका भोसले यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0