'मला जगायचं आहे' : उन्नाव बलात्कार पीडितेचे अखेरचे शब्द

07 Dec 2019 10:30:56


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी संपली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने तिला चंदीगडहून एअरलिफ्टद्वारे दिल्लीत हलवण्यात आले होते. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. 'मला जगायचं आहे', या तिच्या अखेरच्या वाक्याने संपूर्ण देशाचे मन सुन्न झाले आहे. पीडिनेने आपल्या भावाला अखेरच्या क्षणी 'मला जगायचं आहे', हे सांगून आपले प्राण सोडले.

 

रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांतर्फे तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तिला वाचवण्यात अपयश आले. 'मला जगायचं आहे', हे तिच्या तोंडी शेवटचे शब्द होते, अशी माहिती तिच्या भावाने दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे.

 

उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर पीडितेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला गेला. ९५ टक्के शरीर भाजल्यानंतरही पीडिता सुमारे एक किलोमीटर चालत गेली होती. गावातील लोकांच्या माहितीनुसार तिने मदतीची याचना केली होती. अशातच तिने स्वतःहून फोन करून पोलिसांना घडला प्रकार सांगितला होता. तिच्या वैद्यकीय चाचणीत शरीरावर मारहाणीचा निशाण नव्हते चाकू किंवा तत्सम धारदार शस्त्राने पीडितेववर हल्ला झाला नव्हता, असे या वैद्यकीय अहवालात निदर्शनास आले होते. पोलिसांनी या प्रकरणात पाचही आरोपींना अटक केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबद्दल कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Powered By Sangraha 9.0