अंजनेरी : पवनपुत्र हनुमानाचा जन्म ज्या भूमीत झाला, त्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी विवेकानंद केंद्राच्या ५०० विद्यार्थ्यांनी १०८ सामुहिक सूर्यनमस्कार केले.
पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत ऊठून प्रातःस्मरण करून तयार झालेले विद्यार्थी सकाळी सहा वाजता ब्रह्मा व्हॅली कॉलेजच्या मैदानात उतरले.
तापमान दहा अंशांवर असताना ओंकाराचा नाद घुमवत, रवये नमः, मित्राय नमः अशी प्रार्थना करत एकेक आसन स्थितीत २४ अवस्था पार करून सूर्यनमस्कार पूर्ण करत होते.
सुर्योदयावेळी १०८ सूर्य नमस्कार पूर्ण करून विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष केला. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक भिमाशंकर ढोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे, पोलिस शिपाई अनिल चारोस्कर, बाळासाहेब निंबेकर, जनार्दन दिंडे, सूरज झोटिंग, नगरसेवक विष्णू दोबाडे, ब्रह्मा व्हॅलीचे रजिस्ट्रार समाधान पगार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
केंद्राचे जीवनव्रती सुमित शिवहरे व सुजाता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार प्रशिक्षण देण्यात आले. हर्षवर्धन देशमुख यांनी संचालन केले.