राहुल गांधी खोटारड्यांचे सरदार ; संबित पात्रांचा टोला

26 Dec 2019 17:12:59


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : "काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना कोणत्याच विषयाची माहिती नसते. मात्र, प्रत्येक विषयावर मत मांडायची त्यांना हौस असते. यापूर्वी राफेलविषयी आणि आता एनआरसीविषयीही ते धादांत खोटे बोलत आहेत, ते पाहता राहुल गांधी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, असेच म्हणवे लागेल." अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकारपरिषदेत गुरूवारी केली. 'एनआरसी आणि डिटेंशन कॅम्पविषयी आरएसएसचे पंतप्रधान खोटे बोलत आहेत,' असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते. भाजपतर्फे डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकारपरिषदेत त्यास प्रत्युत्तर दिले.

 

"नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नाही. आरएसएसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतमातेशी खोटे बोलले, अशा प्रकारची भाषा राहुल गांधी यांनी वापरली आहे. मात्र, राहुल गांधींकडून चांगल्या भाषेची अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. वारंवार खोटी वक्तव्ये करणे हीच त्यांची कार्यशैली आहे, यापूर्वी राफेल कराराविषयी सर्वोच्च न्यायालयाचे नाव घेऊन खोटे बोलल्यामुळे त्यांना माफी मागावी लागली होती. त्यामुळे राहुल गांधी यांना खोटारड्यांचे सरदार म्हणणेच योग्य ठरेल." असा टोला डॉ. पात्रा यांनी लगावला आहे.

 

"एनआरसीनंतर भारतीय मुस्लिमांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले जाईल, यात कोणतेही तथ्य नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये पंतप्रधान काय खोटं बोलले? हे काँग्रेसने सांगावे. त्याचप्रमाणे डिटेंशन कॅम्प काँग्रेसच्या कार्यकाळात २०११ साली आसाममध्ये उघडण्यात आले होते, असे सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आसाम सरकारने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत केंद्र सरकारने राज्य सरकारला डिटेंशन कॅम्प उघडावे, असे निर्देश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता खोटेपणाचे राजकारण बंद करावे." असेही डॉ. पात्रा यांनी सांगितले आहे.

Powered By Sangraha 9.0