नागपूर : आरे ला जंगल घोषित करू असे आश्वासन दिलेल्या शिवसेनेने सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या मेट्रोच्या कारशेड च्या कामाला स्थगिती दिली त्याच शिवसेनेने आता आरे तील आदिवासीपाडे स्थलांतरित करून हा पट्टा निवासी करून खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवर बोलताना शिवसेना सदस्य रवींद्र वायकर यांनी अशी भूमिका मांडली की, आरे मधील आदिवासी पाडे व विविध ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकामे पुनर्विकासित करण्यासाठी आरे मधील एका मोठ्या भूखंडावर विकास आराखड्या अंतर्गत निवासी आरक्षण करून या पट्ट्यातील घरांना पुनर्विकासित करावे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी आक्रमकपणे आरेतील भूखंड हडप करण्याचा हा डाव असल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या या भुमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.
मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या मेट्रो कारशेडचे काम ज्या शिवसेनेने बंद पडले त्या शिवसेनेचे सदस्य आरेतील भूखंड निवासी करा अशी मागणी करीत आहेत. हा आरेतील भूखंड खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असेल तर तो आम्ही हाणून पडू असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.