भारताचा विंडीजवर बॉलिंग स्ट्राईक ; मालिकेत पुन्हा एकदा बरोबरी

18 Dec 2019 20:48:44


asf_1  H x W: 0

 


विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने विंडीजवर १०७ धावांनी विजय मिळवला. ३८८ धावांचा डोंगर सर करताना विंडीजचा डाव २८० धावांवर आटोपला. यामध्ये मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या. तर, कुलदीप यादवने त्याच्या जाळ्यात अडकवत हॅट्ट्रिक साधली. तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि के.एल. राहुलची शतकी खेळी तर, श्रेयस अय्यर आणि रिषभ पॅन्टच्या तुफान फटकेबाजीने भारताने विंडीजसामोर ३८८ धावांचा डोंगर रचला होता. मालिकेमध्ये आता १-१ अशी बरोबरी असून काटकमधील तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरणार आहे.

 

भारताचा ३८८ धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात तशी चांगली झाली. सुरुवातीला लेविस आणि होपच्या अर्धशतकी भागीदारीने भारताला जेरीस आणले होते. शार्दूल ठाकूरने लेवीसची पहिली विकेट काढत भारताच्या आशा पल्लवित केल्या. होपने ७८ धावांची खेळी केली, पण कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये तो अडकला. त्यानंतर मात्र, विंडीजला ३८८ धावांचा डोंगर सर करण्यासाठी संघर्ष करावा लागला. पुरणची ७५ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. किरेन पोलार्डदेखील शून्यावर बाद झाला. भारताकडून चायनामॅन कुलदीप यादवने हॅट्ट्रिक करत ३ विकेट काढल्या. तसेच, मोहम्मद शमी सलग ३ विकेट काढून भारताच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. शार्दुलने १ तर रवींद्र जडेजाने २ विकेट घेतले.

 

त्याआधी पहिले फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर जोडी रोहित आणि राहुल यांनी ३६ षटकात २२७ धावांची सलामी दिली. केएल राहुल १०४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारासह १०२ धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आलेला भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा 'फेल' ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. एका बाजू पकडून रोहित शर्माने आक्रमक खेळी कायम ठेवली. त्याने श्रेयश अय्यर सोबत झटपट अर्धशतकी भागिदारी केली. रोहित १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १५९ धावा करून बाद झाला. पुढे पंतने १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर अय्यरही ३२ चेंडूत ५३ धावांवर बाद झाला.

Powered By Sangraha 9.0