नागपूर : महाविकास आघाडीत अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. आमच्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, असे मात्र, आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागपूर येथे सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्य पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रीया देताना त्यांनी हे उत्तर दिले. शिवसेनेने आपली भूमीका काल स्पष्ट केली आहे. ती आजही राहील, असे ते म्हणाले. सावरकरांच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी विरोधी पक्षांसाठी नाही, जनतेची कामे करण्यासाठी मुख्यमंत्री झालो आहे. देशात गंभीर स्थिती आहे, आसाम,बंगाल पेटला आहे. ती जबाबदारी कुणाची?, मुख्य प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा देशभरात गोंधळ उडवून देणारे मुद्दे पुढे आणत आहे. आम्ही कुठल्याही विकास कामांना स्थगिती दिलेली नाही. भाजपाने स्थगित केलेल्या विकासकामांची यादी द्यावी. ज्या कामांबद्दल तक्रारी आहेत, त्याबद्दल चौकशी सुरू केली आहे.", असेही ते म्हणाले.
सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी ठरावाची गरज काय ?
"सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी आमच्या ठरावाची गरज काय, भाजपच्या हातात सर्वाअधिकार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजवर भारतरत्न का मिळाला नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. विरोधकांनी टाकलेल्या चहापानावरील बहिष्कारावर प्रतिक्रीया देताना 'चहापानावर बहिष्कार टाकणे ही एक परंपराच झाली आहे का ?, ' असा प्रश्न त्यांनी विचारला.