‘ग्रेटा’च्या निमिताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2019   
Total Views |

TIME _1  H x W:

 


जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हा आज दारिद्य्र, कुपोषण, महागाई, बेरोजगारी यांच्यासह एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून जगासमोर उभा ठाकला आहे. पर्यावरण ही आपली सर्वांची संपत्ती आहे. त्यामुळे या संपत्तीचा आपल्याला हवा तसा वापर करणे, हे आपले कामच आहे. असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि हवामान बदल यासाठी चिंता करणारे आणि काम करणारे नागरिक जगाच्या पाठीवर आज नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

तारुण्यात पदर्पण केल्यावर किंवा अगदी उतारवयात पोहोचून आयुष्याच्या तिन्ही सांजेलादेखील आपल्या कार्यकर्तृत्वाने जागतिक तापमान वाढीची चिंता करत सातत्याने अहोरात्र कार्य करणारे पर्यावरणप्रेमी आज जगात आपले कार्य करत आहेत. मात्र, पडद्यामागील या थोर कार्यकर्त्यांना प्रसिद्धी दिली जात नाही आणि या कार्यकर्त्यांची तशी अपेक्षादेखील नसते. मात्र, अगदीच पोरसवजा वयात केवळ जागतिक नेतृत्व आणि काही औद्योगिक कंपन्या यांना केंद्रस्थानी ठेवून ते कसे जागतिक तापमान वाढीबाबत केवळ बोलघेवडेपणा करत आहे आणि कृती मात्र शून्य आहे, हे सांगण्यात आणि आपला ‘ग्रेटनेस’ सिद्ध करण्यात ग्रेटा थनबर्ग या युवतीने धन्यता मानली आहे, असे वाटते.

 

बाल्यावस्थेतच हवामानदृष्ट्या पोषक वातावरण जीवनाला प्राप्त व्हावे आणि जागतिक तापमान वाढीसंबंधी केवळ बोलण्यापेक्षा कृतिशीलतेला महत्त्व द्यावे, अशी अपेक्षा जगभरातील नागरिकांची नक्कीच आहे. माद्रिदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान चर्चेत (सीओपी २६) या १६ वर्षीय तरुणीने आपल्या विचारांचे दर्शन घडविताना पर्यावरण रक्षणासाठी आपणच कसे जगात कनवाळू आहोत, हे सिद्ध करण्यात मात्र बाजी मारली आहे.

 

व्यवसाय क्षेत्र आणि राजकीय पटलावरील नेतृत्व हे जागतिक हवामान बदलाच्या मुद्द्यावरून जगाची दिशाभूल करत असल्याचे मत तिने यावेळी मांडले. जागतिक पटलावर हवामान बदलासंबंधी चर्चा, परिषदा, सादरीकरणे होत असतात. राजकीय नेतृत्व हे वाटाघाटी करत असते. मात्र, तापमान वाढ रोखण्यासाठी यातील कोणीही ठोस अशी कृती करताना दिसून येत नाही, असे मत तिने यावेळी व्यक्त केले. जागतिक स्तरावर वाढणारे तापमान हे पर्यावरणीयदृष्ट्या आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण करणारे आहे. अशा स्थितीत औद्योगिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र हे दिशादर्शकाच्या भूमिकेत जगासमोर येणे अभिप्रेत असताना मात्र, या क्षेत्राकडून दिशाभूल करण्याचेच कार्य होत असल्याचा आरोपच यावेळी ग्रेटाने केला.

 

आज जागतिक पटलावर प्रत्येक अंशागणिक वाढणारे तापमान हे मानवी जीवन तसेच, पर्यावरणीय जैवविविधतेसाठी निश्चितच आव्हान ठरणारे आहे. अशा स्थितीत केवळ आरोप करणे महत्त्वाचे नसून आपल्या कार्याचा वस्तुपाठ निर्माण करणे आवश्यक असल्याचे ग्रेटाने येथे लक्षात घेणे आवश्यक होते, असे वाटते. ’सीओपी २५’ हा पर्यावरणीय समस्यांवरील उपाय शोधणारे व्यासपीठ म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना ग्रेटाने येथे असे न होता पळवाटांवर वाटाघाटी करण्याची काही देशांसाठी ही संधी ठरत असल्याचे धक्कादायक वक्तव्यदेखील केले.

 

जागतिक पर्यावरणाचा होणारा र्‍हास आणि तापमानात होणारी वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. मात्र, अशा मार्गाने विचार करणेदेखील संयुक्तिक नाही, याचे भान आपले मत मांडताना ग्रेटा विसरली असल्याचेच यावरून दिसून येते. वंगारु मथाई, सुंदरलाल बहुगुणा असे अनेकविध पर्यावरणप्रेमी यांनी आपले कार्य चोख बजावले आहे. त्यामुळे ग्रेटाचे हे मत अशा नि:स्पृह आणि नि:स्वार्थी काम करणार्‍यांसाठी निश्चितच वेदनादायी ठरणारे आहे. जागतिक तापमान वाढीसाठी महासत्ता असणारे देश हे सर्वाधिक कारणीभूत आहेत. याकडे मात्र ग्रेटाने जाणीवपूर्वक आपल्या भाषणात दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रेटा न बोलता तिचा कोणी बोलविता धनीच याआडून बोलत आहे की काय, अशी शंका उपस्थित होते.

 

आपणच आपल्याबद्दल वाईट बोललो किंवा कोणाला बोलावयास भाग पाडले तर, उमटणारी प्रतिक्रिया ही प्रभावहीन होते. या मुस्सद्दीपणाचे धोरण अवलंबवीत पर्यावरणाला सर्वाधिक क्षति पोहचविणारे घटक किंवा व्यवसाय तर ग्रेटाचे बोलविते धनी नाहीत ना अशी शंका यामुळे येत आहे. पर्यावरणाबाबत जगात केवळ बोलणे न होता कृतिशीलता देखील होत आहे. याची माहिती ग्रेटाने जाणून घेवून प्रकट होणे आवश्यक होते, असे वाटते. ग्रेटाच्या निमिताने पर्यावरण रक्षणासंबंधी कृती वेगळी आणि बोलणे वेगळे असा पायंडा जागतिक पटलावर पडू नये, हीच अपेक्षा.

@@AUTHORINFO_V1@@