मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अपमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा तसेच शिवसेनेनेसुद्धा काँग्रेससोबतची अनैसर्गिक युती तोडावी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चालविलेला सावरकरांचा अवमान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे,”असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.
ते म्हणाले, “शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मवाळ भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघ आहे, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. तसा शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यानंतर भाजपसोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना-भाजप महायुतीचे सरकारच स्थिर आणि टिकाऊ सरकार ठरेल,” असे आवाहन आठवले यांनी केले.