नवी दिल्ली : शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर कॉंग्रेसने 'भारत बचाओ मेळावा' घेतला. ज्यामध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्ला केला. झारखंडमधील मेळाव्यात राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' या वक्तव्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ उडाला होता आणि भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांनी भारतीय जनतेची माफी मागावी अशी मागणी केली होती. या मागणीला नकार देत राहुल गांधी म्हणाले की, माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नव्हे. मी मरेपर्यंत क्षमा मागणार नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट केले की,'राहुल यांनी आडनाव उधार घेतले आहे. वीर सावरकर खरे देशभक्त होते. असं उधारीचे आडनाव घेऊन कोणी गांधी किंवा देशभक्त होत नाही. देशभक्त होण्यासाठी शरीरात हिंदुस्थानी रक्तच हवे. अनेकांनी वेश बदलून भारत लुटला आहे, आता असे होणार नाही.' असे म्हणत, हे त्रिकूट कोण आहे? हे तीघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला.