नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत पारित झाल्यानंतर आसाममध्ये जोरदार हिंसाचार भडकला आहे. कित्येक जागी हिंसाचारांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे सुरक्षादलांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली आहे. तसेच काही ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंद करण्यात आले आहे.
आसाममध्ये वाढत्या हिंसाचाराबद्दल सावधागिरी म्हणून अनेक रेल्वेगाड्या आणि विमाने रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. विमानांची उड्डाणे रद्द करणाऱ्या कंपन्यांमध्ये इंडिगो, एअर इंडिया, स्पाईस जेट, गो एअर आदींचा सामावेश आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पूर्वोत्तर राज्यातील अधिकारी संजीव जिंदाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिब्रुगढ येथील नऊ विमान फेऱ्या रद्द झाल्या आहेत. टॅक्सी सेवा विमानतळावर उपलब्ध नसल्याने अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.
'इंडिगो'तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये सुरू असलेल्या हिंसाचार व आंदोलनामुळे गुहावटी आणि डिब्रुगढ या ठिकाणातील विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. १३ डिसेंबरपर्यंत बुकींग झालेल्या तिकीटांच्याही वेळा बदलण्यात आल्या आहेत. 'विस्तारा' कंपनीने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या निर्देशांनुसार, ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, त्यांनी केवळ कोलकाता आणि डिब्रुगढ या दरम्यानची उड्डाणे रद्द केली आहेत. गो एअरतर्फे आसामसाठी सर्व उड्डाणे बंद केली आहेत. या प्रकरणी सरकारतर्फे कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया मिळू शकलेली नाही.
रेल्वे गाड्यांच्या फेऱ्याही रद्द
भारतीय रेल्वे निर्देशक आर. डी. वाजपेयी यांच्या माहितीनुसार, कुठलीही रेल्वे ही गुहावटीच्या पुढे जाऊ शकत नाही, रेल्वे सेवा आपल्या निर्धारित वेळेनुसार गुहावटी येथून पुन्हा परतीच्या मार्गावर सोडली जाईल. दिल्ली आणि अन्य पूर्वोत्तर राज्यांतील रेल्वे सेवा निर्धारित वेळेत सुरू आहे. मात्र, गुहावटीहून सर्व रेल्वेगाड्या मागे आणल्या जात आहेत. रद्द झालेल्या गाड्यांची नावे लवकरच अधिकृतरित्या घोषित केली जातील. पूर्वोत्तर सीमाभागांत जाणाऱ्या तीन रेल्वेगाड्या अद्याप रद्द झाल्या आहेत. पूर्वोत्तर सीमा भागातील रेल्वे विभागाने ३० गाड्या रद्द झाल्याची माहिती जारी करण्यात आली आहे.