मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात दुरुस्त्या सुचवून शिवसेनेने लोकसभेत विधेयकास पाठिंबा दिला. मात्र त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे मात्र आता शिवसेनेने भूमिका बदलत विधेयकावरील निर्णयातुन माघार घेत राज्यसभेत पाठिंबा देणार नसल्याचे संकेत दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्यसभेत या विधेयकाला शिवसेना पाठिंबा देईल की नाही या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फक्त सांगितले की, “लोकसभेत जे घडले ते विसरून जा. हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडले जाईल. त्यावेळी पक्षाची भूमिका बुधवारी कळेल." त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की," काही गोष्टी स्पष्ट होईपर्यंत आम्ही या विधेयकाचे समर्थन करणार नाही." तर याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, "या विधेयकाला पक्ष पाठिंबा देईल. शिवसेनेची वेगवेगळी भूमिका असत नाही. राष्ट्रहिताच्या मुद्द्याला शिवसेनेने नेहमीच प्राधान्य दिले आहे."
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेत मांडण्यात आले. त्याठिकाणी त्याला मंजुरी मिळाली असली तरी आता राज्यसभेतील विधेयकावरील चित्र बुधवारी स्पष्ट होईल.