संविधान : भारतीय लोकशाहीचा आत्मा

    26-Nov-2019
Total Views |


 


भारताची राज्यघटना (संविधान) ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून गणली जाते आणि मी 'भारतीय' आहे, याचा मला अभिमान आहे.

 

दि. १५ ऑगस्ट, १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्यावर देशाचा कारभार कसा चालवायचा, निरनिराळ्या जाती, धर्म, पंथ, वर्ण असलेल्या देशाची राज्यघटना कशी असावी, हा पंडित जवाहरलाल नेहरु व सरदार वल्लभभाई पटेल यांना पडलेला प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ सर जेनिंग यांची भेट घेतली व त्यांना भारताची राज्यघटना लिहिण्याची विनंती केली. त्यावर सर जेनिंग म्हणाले की, “तुमच्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही अशी कायदेतज्ज्ञ व्यक्ती आहे की, जी भारताची राज्यघटना माझ्यापेक्षा उत्कृष्ट लिहू शकते. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच माझे गुरू आहेत.” प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ सर जेनिंग यांच्या या वाक्यातच डॉ. बाबासाहेब किती महान व श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ होते, याची आपल्याला प्रचिती येते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सोपविली. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलून २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस अहोरात्र मेहनत करून भारताची म्हणजेच आपल्या देशाची राज्यघटना लिहिली.

 

सुरुवातीला राज्यघटनेत २२ प्रकरणे १९५ कलमे व ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २४ प्रकरणे ४५१ कलमे आणि २ परिशिष्टे आहेत. आपल्याला माहीत आहे का, भारताची राज्यघटना ही १२ हजार पानांची तयार झाली होती. त्या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे व १६५ बैठका झाल्या. २२ नोव्हेंबर, १९४९ पर्यंत संविधानावर ६३ लाख, १६ हजार, ७२९ इतका खर्च त्यावेळी झाला होता. यावरून आपली राज्यघटना किती प्रदीर्घ व मूल्यवान आहे, याची प्रचिती येते. आपले संविधान हे लोकशाही तत्त्वावर चालणारे आहे. म्हणजे काय, तर लोकशासन. "Democracy is the government of the people by the people and for the people.' म्हणजेच लोकशाहीमध्ये शासन हे लोकांचे आहे, लोकांनी चालविलेले व लोकांसाठीचे शासन होय. आज संपूर्ण जगामध्ये आपल्या राज्यघटनेचा सन्मान केला जातो. का नाही करणार? विविध जाती, धर्म, वंश, रुढी, परंपरांनी नटलेला आपला देश डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच एकसंध उभा आहे.

 

आज तुम्ही जगाच्या नकाशावर कुठलाही देश पाहा, तिथे तुम्हाला एकाच धर्माचे लोक दिसतील. आपण आपल्या शेजारील राष्ट्रे पाहिली तर आपल्या लक्षात येईल. पाकिस्तान - मुस्लीम धर्म, नेपाळ - बौद्ध धर्म, अफगाणिस्तान - मुस्लीम धर्म, चीन - बौद्ध धर्म, श्रीलंका - बौद्ध धर्म. खरे पाहिले तर या जगामध्ये तीन धर्माचे लोक आपल्याला आढळतात. १)ख्रिश्चन २) बौद्ध ३)मुस्लीम. म्हणजे एका देशात एकाच धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने राहतात. पण, आपल्या देशात ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लीम, हिंदू, शीख इ. सर्व धर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र राहतात. याचे कारणच डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आहे. कारण, आपल्या संविधानाचा गाभा हा लोकशाहीचा आहे व आपले संविधान हे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या चतु:सुत्रीवर आधारलेले आहे. ते कसे हे पाहू...

 

) न्याय : 'न्याय' हा भारतीय लोकशाहीचा पहिला स्तंभ आहे. भारतीय संविधानात 'न्याय' व 'सामाजिक न्याय' या दोघांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण देण्यात आले आहे. सामाजिक न्यायाची रचना भारतात सर्वप्रथम भगवान गौतम बुद्धांनी मांडली. समता प्रस्थापित करणारे ते पहिले भारतीय. जर कोणी स्वैराचार करत असेल व दुसर्‍या व्यक्तीला त्रास होईल असे वर्तन करत असेल, तर त्यासाठी संविधानाने पोलीस यंत्रणा, न्यायपालिका यांची स्थापना करण्यात आलेली आहे, जेणेकरून देशातील प्रत्येकाला आपल्यावर झालेल्या अन्यायाला वा अत्याचाराला वाचा फोडण्याचा अधिकार दिला म्हणजे व न्याय मिळवण्याचाही अधिकार दिला आहे.

 

) स्वातंत्र्य : स्वातंत्र्य हा भारतीय लोकशाहीचा दुसरा स्तंभ. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राणवायू आहे. आपल्या राज्यघटनेत 'कलम १९' प्रमाणे प्रत्येक नागरिकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शांततापूर्व व नि:शस्त्र सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतात कुठेही फिरण्याचे, राहण्याचे, मालमत्ता विकत घेण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे, कुठेही व कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य उपभोगताना कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कुठल्याही धर्माचा, जातीचा अनादर होऊ नये याची ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे.

 

) समता : लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे समता. समता हा लोकशाही आत्मा आहे. समतेमुळे समाजात राज्यात व देशात संतुलन राहते. समता व न्याय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सर्वांना समान संधी, समान दर्जा, समान वागणूक देणे म्हणजेच न्याय! सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. मग त्यात गरीब, श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव नाही. समतेच्या व्याख्येत जात, धर्म, वंश, पंथ, वर्ण, लिंग यांना कुठलाही थारा नाही.

 

) बंधुभाव : भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे बंधुभाव. इतरांविषयीच्या आपुलकीतून जिव्हाळ्यातून बंधुभावाची भावना निर्माण होते. बंधुभाव हा लादता येत नाही, तो संवेदनशीलतेतून निर्माण होतो. म्हणजे काय तर 'रिस्पेक्ट.' बंधुभावातूनच आपल्याला एकमेकांचा आदर करण्याची भावना निर्माण होते व या बंधुभावामुळेच लोकशाही मजबूत होण्याचे कार्य होते. यात कोणाचेही दुमत असणार नाही. बंधुता ही व्यक्तीची प्रतिष्ठा, तसेच राष्ट्राची एकता व एकात्मता राखणारी आहे. आहे का कुठल्या लोकशाही देशात असे संविधान? तर मुळीच नाही. कारण, आपल्याकडे आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. The Symbol of Knowledge आणि घटनेचे शिल्पकार! जसा मूर्तिकार शिल्प घडवतो, त्याचप्रकारे डॉ. बाबासाहेबांनी घटना अथक परिश्रमातून आपल्या ज्ञानातून घडवली आहे. आपण या देशात जन्माला आलो हे आपले भाग्यच आहे. कारण, या देशाचा कारभार लोकशाहीप्रमाणे चालतो व तो न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या चतु:सुत्रींवर चालतो, जी बाबासाहेबांनी लिहिली आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे,“जर लोकशाही संपली, तर सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल.” लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू. त्यामुळे लोकशाही टिकवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी नव्हे कर्तव्य आहे. इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, संविधानाने आपल्याला काय दिले? तर संविधानाने आपल्याला प्रजासत्ताक राष्ट्र दिले. २६ जानेवारी, १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक बनणे म्हणजे काय? तर प्रजेची सत्ता असणारे राष्ट्र निर्माण होणे. पूर्वी राजा हा आईच्या उदरातून जन्माला येत असे. म्हणजे एखाद्या राजघराण्यात जो मुलगा जन्माला येई, तो पुढचा राजा असे. मग तो कसा का असेना! संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे.

 

एक व्यक्ती म्हणजे एक मत. म्हणजेच २६ जानेवारी, १९५० पासून 'राजा' हा मतांच्या पेटीतून जन्माला येऊ लागला. नागरिक आपल्या मतांद्वारे 'राजा' निवडून देऊ लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. सामान्य कुटुंबातून जन्माला आलेली उदरनिर्वाहासाठी चहा विकणारी व्यक्ती भारताच्या पंतप्रधानपदी आज विराजममान आहे. हे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच! मानवाची मूल्य जपणारे, त्यांना स्वातंत्र्य बहाल करणारे, त्यांची रक्षा करणारे, प्रत्येक जातीचा, धर्माचा, यशाचा, वर्गाचा आदर करणारे स्त्री असो वा पुरुष सर्वजण समान...

 

या समानतेचा अवलंब करणारे एकमेकांशी बंधुभावाने वागायला शिकवणारे संविधान खरोखरच किती श्रेष्ठ आहे, याची आपल्याला कल्पना येते. हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी या देशाला बहाल केले म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून गौरविला जातो. याच संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो आणि याच संविधानामुळे आपला देश प्रगतिपथावरआहे, यात काडीमात्रही शंका नाही. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांचा जितका गौरव करावा तितका कमीच आहे. अशा या महामानवाचा आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानातील आदर्श मूल्यांचा या संविधान दिनी मनापासून अंगीकार करूया आणि प्रगत लोकशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी योगदान देऊया.

 

जय भीम, जय भारत

- मिलिंद नाईक

(लेखक दि कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेडचे संचालक आहेत.)