आता 'नो-बॉल'चा निर्णय थेट तिसऱ्या पंचांकडे

25 Nov 2019 17:54:41


 


नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेत बाजी मारल्यानंतर भारताची 'विराट'सेना विंडीजविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत आयसीसीने मोठा बदल करण्याचे ठरवले आहेत. सामना फिरवणारे नो बॉल च्या काही निर्णयांवरून आयसीसीने एक छोटा बदल करणार असल्याचे एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले.

 

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात मैदानावरील पंचांनी तब्बल २१ नो-बॉलचे निर्णय दिलेच नाहीत. ज्यामुळे पंचांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोशल मीडियावर आयसीसीच्या आणि पंचांच्या निर्णयाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे तर दिग्गज क्रिकेटपटूननीदेखील या गोष्टीवर टीका केली. त्यामुळे पुन्हा एकदा पंचांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उभे राहू लागले.

 

यामुळे आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेमध्ये तिसरे पंच नो-बॉलचा निर्णय देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापूर्वी २०१९ आयपीएल हंगामात अशाच प्रकारे पंच एस.रवी यांनी नो-बॉलचा निर्णय दिलाच नव्हता. ज्यानंतर आयसीसीने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. प्रदीर्घ काळ झालेल्या चर्चेनंतर आयसीसीने नवीन नियम आखताना तिसऱ्या पंचांकडे नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी सोपवली होती. या नवीन निर्णयाची अंमलबजावणी आता भारत विरुद्ध विंडीज मालिकेत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0