लोणावळा (अक्षय मांडवकर) - राज्यातील सहा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'सोबत (बीएनएचएस) सामंज्यस करार करुन पुढील चार वर्षांमध्ये हा कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या सहा पाणथळ जागांसंबधी संवर्धनात्मक धोरणांच्या निर्मितीकरिता हा राज्य कृती आराखडा महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतरित पट्ट्याअंतर्गत भाारतातील पाणथळींच्या संवर्धनाकरिता 'बीएनएचएस'ने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. गेल्या वर्षी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या आराखड्याला मान्यता दिली होती. याअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांबरोबर देशातील पाणथळ जागांच्या संवर्धनाकरिता कृती आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृती आराखड्यात महाराष्ट्रातील केवळ तीन आणि शिवडी-न्हावा शेवा-अलिबाग या अखंडीत स्वरुपातील पाणथळीचा समावेश आहे. त्यामुळे वन विभागाने 'बीएनएचएस'च्या मदतीने राज्याचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निश्चित केले आहे. या संबंधीची घोषणा 'कांदळवन संरक्षण विभागा'चे ( मॅंग्रोव्ह सेल) अप्पर मुख्य प्रधान वनसंरक्षक एन.वासुदेवन यांनी मंगळवारी 'बीएनएचएस' आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केली. 'बीएनएचएस'ने 'मध्य-आशिया हवाईमार्गावरील स्थलांतरित पक्षी आणि पाणथळ जागा' या विषयाावर लोणावळ्यात पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
राज्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्याकरिता 'बीएनएचएस'सोबत सामंज्यस करार लवकरच करण्यात येणार माहिती एन.वासुदेवन यांनी दै.'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या कृती आराखड्याकरिता राज्यातील सहा पाणथळींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जायकवाडी, गंगापूर, नांदुरमधमेश्वर, हतणूर, विसापूर आणि उज्जनीच्या पाणलोट क्षेत्राचा समावेश आहे. राज्य कृती आराखड्याकरिता निवडण्यात आलेल्या सहा पाणथळीच्या जागा पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतरित पट्ट्यामधील महत्त्वाच्या जागा असल्याची माहिती 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी दिली. राष्ट्रीय कृती आरखड्याप्रमाणेच या आराखड्यातील पाणथळींच्या विकासाबाबत 'बीएनएचएस' चार मुद्द्यांवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सहा पाणथळ जागांची जैवविविधता तपासणे, त्याठिकाणी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची मोजणी व स्थलांतर पट्ट्याच्या अभ्यास करणे आणि या जागांच्या संवर्धनासाठी तेथील प्रत्येकी २० वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. हा संपूर्ण कृती आराखडा तयार करण्यासाठी चार वर्षांचा कलावधी लागणार असून त्यासाठी २.६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.