मुंबई : शरद पवार यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चा अधिक रंगू लागली. मोदी-पवार भेटीत काय घडले, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. याची कोंडी फोडत, आमच्या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि चर्चा केली.
पंतप्रधान मोदींची भेट घेऊन शरद पवार यांनी महाराष्ट्रात ओला आणि कोरड्या दुष्काळाची माहीती दिली. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष राज्यात एकत्र सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेने आघाडीसोबत सरकार स्थापण्याची तयारी दाखवली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय घेण्यासाठी सतत बैठका सुरू आहेत.