नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "२००३मध्ये अटलजींनी उल्लेख केला होता. राज्यसभा दूसरे सदन असेल मात्र, त्याचे महत्व कमी होता कामा नये. राज्यसभेचा देशाच्या विकासात सक्रीय सहभाग असायला हवा." राज्यसभेच्या २५०व्या सत्रात त्यांनी सभागृहाला संबोधित केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, "जनतेच्या भावभावनेचे हे सभागृह प्रतिक मानले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेच्या माध्यमातूनच मोठे योगदान दिले आहे. राज्यसभेचे महत्व अनन्य साधारण असायला हवे. राज्यसभेने अडवणूकीचे कारण बनू नये, प्रवाही व्हायला हवे.", असे आवाहनही त्यांनी केले. 'राज्यसभेत गोंधळ घालून काहीही होत नाही, मुद्द्यांवर तोडगा निघत नाही, राजकीय पक्षांनी याचा विचार करायला हवा. विरोध करताना काळजी घ्यायला हवी, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेचेही कौतूक केले.'
'राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशी भूमिका घेतली होती. कि, विरोध करताना सभागृहाच्या 'वेल'मध्ये उतरणार नाही, अशीच भूमिका राष्ट्रवादीनेही घेतली होती. मात्र, आता आनंद वाटत आहे कि, अनेक कठीण प्रसंगातून जात असतानाही राष्ट्रवादीने याचं पालन केले. भाजपनेही हा नियम पाळला होता. मात्र, याचा कुठलाही तोटा दोन्ही पक्षांना झाला नाही.', असे सांगत ही शिकण्यासारखी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.