पॅरिस : जम्मू काश्मिरातून कलम ३७० हटवल्यानंतर भारताविरोधात खोटा प्रचार करणाऱ्या पाकिस्तानने आता अयोद्ध्या प्रकरणावरूनही आपला मुळ स्वभाव सोडलेला नाही. मात्र, पाकिस्तानच्या 'डीएनए'मध्येच दहशतवाद आहे, असे सांगत भारताने पोलखोल केली आहे. 'पाकिस्तान भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये वारंवार दखल देण्याचा प्रयत्न करत असून स्वतःच्या देशात मानवाधिकाराची पायमल्ली करत असल्याचेही पाकिस्तानने सांगितले.
युनेस्कोमध्ये घेण्यात आलेल्या ४०व्या सर्वसाधारण परिषदेत पाकिस्तानी प्रतिनिधींनी अयोद्ध्या निकालाचा मुद्दा उपस्थित केला व त्यावर भाष्य केले. दरम्यान, यावर उत्तर देताना भारतीय प्रतिनिधी अनन्या अगरवाल यांनी पाकिस्तानचा दहशतवादाचा अजेंडा जगासमोर आणला. 'दुसऱ्यांच्या घरात काय सुरू आहे, ते पाहण्यात पाकिस्तानला अधिक रस आहे. स्वतःचे घृणास्पद कारनामे लपवण्यासाठी शेजारील देशांचे मुद्दे मांडून खोटे दावे करण्याचा प्रयत्न पाक करत आहे. त्यांचा देशदहशतवाद्यांनी पोखरला आहे. अल्पसंख्यांकावर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांकांची रोडावलेली लोकसंख्या हे त्याचेच एक उदाहरण आहे.', असे सांगत पाकिस्तानच्या कारनाम्यांचा पाढाच वाचून दाखवला.