थोर माणसांचा सहवास लाभणे, भाग्यात असावे लागते. आपण सर्व पुनर्जन्म मानणारे आहोत. मागील जन्मात माझ्या हातून काही पुण्य घडले असावे, त्यामुळे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजींसारख्या थोर पुरुषाचा सहवास मला लाभला. दत्तोपंतांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ऊस जसा अंतर्बाह्य गोड असतो, तसे दत्तोपंत ठेंगडी म्हणजे अंतर्बाह्य गोडवा.
माझा जेव्हा त्यांच्याशी परिचय झाला, तेव्हा मी वयाने केवळ लहान होतो असे नाही तर सर्वच बाबतीत मी त्यांच्यापुढे एक सामान्य माणूस होतो. आम्हा दोघांना जोडणारा दुवा म्हणजे आम्ही दोघे संघ स्वयंसेवक होतो. ते प्रचारक होते, मी प्रचारक नव्हतो, एवढाच आमच्यातील फरक. दत्तोपंतांचे मोठेपण यात होते की, ते माझ्यासारख्या सामान्य स्वयंसेवकाशी माझ्या पातळीवर येऊन संवाद करीत, ही फार अवघड गोष्ट आहे. माणूस मोठा झाला की, तो इतरांना दुर्लभ होत जातो. सामान्य माणूस आणि त्याच्यामध्ये खूप अंतर पडत जाते. तसे दत्तोपंतांच्या बाबतीत नव्हते. ‘अलौकिक असावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती’ याचे मूर्तिमंत उदाहरण दत्तोपंत होते.
संघात त्यांचा दर्जा सरसंघचालक समकक्ष होता. ते अतिशय बुद्धीमान होते. त्यांचे वाचन अफाट होते. तेवढेच मनन, चिंतनदेखील अफाटच होते. संघटनशास्त्रातील ते महातज्ज्ञ होते. वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीतील त्यांचे योगदान अद्वितीय होते. राष्ट्र, समाज, समाजापुढील प्रश्न, राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न, अशा सर्व विषयांतील ते ‘मास्टर’ होते. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर यापैकी काहीही जाणवत नसे. आपण आपल्या मित्राशी बोलतो आहोत किंवा घरातील वडीलधार्या व्यक्तीशी बोलत आहोत, असेच वाटत असे. माणूस कितीही मोठा झाला तरी तो जेव्हा घरात असतो, तेव्हा तो कुणाचा भाऊ असतो, काका-मामा असतो, पती असतो, अशा विविध नात्यात तो जगतो. या नातेसंबंधातील सर्वांना असा माणूस आपला वाटतो. कारण तो त्यांच्यापुढे बसला असताना तत्त्वज्ञानावर भाषण करीत नाही. भाजी कशी झाली, नाटक कसे होते, कपडे छान आहेत, घरातील एखादी नवीन वस्तू असेल तर, ती कुणी आणली, कोठून आणली, असेच विषय चालतात.
दुसरे दडपण त्यांच्या सुरक्षेचे होते. पोलीस आणि गुप्तचरांना त्यांचा सुगावा लागता कामा नये, याची काळजी करावी लागत होती. पहिले काम मला करावे लागले. ते म्हणजे दत्तोपंतांना धोतर आणि झब्ब्यातून, पॅण्ट-शर्टमध्ये आणावे लागले. तेव्हा मी टेलर काम करीत होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे मी त्यांच्यासाठी टेरीवूलचे कापड आणले, त्यांचे माप घेतले आणि दोन पॅण्ट व बुशशर्ट शिवून आणले. पोशाखात बदल झाल्यामुळे तत्काळ ओळखण्याची खूण गेली. हळूहळू दत्तोपंतांबरोबर राहण्याची मला सवय होत गेली. काही काम नसले की, संध्याकाळी फिरायला जाण्याचा विषय असे. मी त्यांना घेऊन जुहू चौपाटीवर जात असे. जुहू चौपाटीवर गेल्यानंतर भेळ खायचा आनंद घ्यायचा असतो. पण दत्तोपंतांना कसे विचारणार, "भेळ खाणार का?" माझी अडचण दत्तोपंतांनी सोडवली. तेच म्हणाले, "रमेश, आपण भेळ खाऊ आणि नंतर ऊसाचा रस घेऊ." त्यांच्याबरोबर खाल्लेली भेळ आणि ऊसाचा रस आणि त्याची गोडी माझ्या मनात अजून कायम आहे. एक दिवस असेच फिरत असताना दत्तोपंत मला म्हणाले, "तुुला हे गाणं माहीत आहे का?" असे म्हणून त्यांनी बैजू बावरातील ‘मोहे भूल गये सावरियाँ’ हे लतादीदींचे गाणे गुणगुणायला सुरुवात केली. त्यातील ‘प्रीत है झुठी, प्रितम झूठा, झूठी है सारी नगरिया’ ही ओळ म्हणून ते थांबले आणि थोडे गंभीरही झाले. संघाचा ज्येष्ठ प्रचारक, तत्त्वज्ञ, सिनेमातील गाणे तोंडपाठ म्हणताना ऐकून मी भारावून गेलो. न बोलताच दत्तोपंतांनी असे काही संस्कार माझ्या मनावर केले की, ते नंतर कायमचे कोरले गेले.
पार्ल्यातच एक बैठक होती आणि बैठकीला अखिल भारतीय स्तरावरील १५-१६ कार्यकर्ते होते. कोण-कोण असणार आहेत, याची नावे माझ्याकडे आली. यातील ५-६ जणांची पथ्ये होती. एका अधिकार्याला तिखटाशिवायचे जेवण हवे होते, दुसर्याला तेल-तूप नसलेले जेवण हवे होते. काही जणांना अमुक भाज्या चालणार नव्हत्या. या सर्वांची काळजी घरातील महिलांनी घेतली. बैठक दिवसभर होती. बैठकीच्या मध्यंतरात चहापान, तेही विनासाखर-साखर, कॉफी, दूध आणि पेय असे प्रकार होते. तेही काटेकोरपणे पाळले गेले. या सर्व व्यवस्थांचे विलक्षण दडपण माझ्या मनावर होतेच. कोणतीही चूक होता कामा नये, यासाठी जागरुक राहून बघावे लागले. पुन्हा हे सर्व कार्यकर्ते भूमिगत, पोलीस त्यांच्या मागावर होते. सगळेजण एकत्र आले नाहीत, जातानाही एक तासाचा कालावधी ठेऊन हळूहळू सर्वजण गेले.
बैठक संपली. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो. दत्तोपंतांनी मला जवळ घेतले आणि म्हणाले, "आज तुला खूप त्रास झाला, खूप श्रम करावे लागले." असे होते दत्तोपंत. सामान्य स्वयंसेवकाची अत्यंत आपुलकीने काळजी करणारे. आणीबाणीच्या काळात एकूण द़ीड-दोन महिने तरी मी त्यांच्याबरोबर राहिलो असेल. या काळात त्यांच्याशी मी कुठलाही वैचारिक संवाद केला नाही. आज माझी ओळख महाराष्ट्रातील एक विचारवंत अशी करून दिली जाते. माझ्यासारखा सामान्य स्वयंसेवक विचारवंत कसा झाला? असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला उत्तर मिळते की, हा परिणाम बहुतेक दत्तोपंतांच्या सहवासाचा असावा. सुगंधाच्या सहवासात आपण गेलो, तर तो सुगंधही आपल्या कपड्याला आपोआपच लागतो, असे बहुधा झाले असावे.
दत्तोपंतांचे निवासाचे आवडते गाव म्हणजे पुणे होते. पुण्यातच त्यांचा मुक्काम खूप काळ राही. ते कधी संघकार्यालयात राहत नसत. राहण्यासाठी ते कुठल्यातरी कार्यकर्त्याचे घर पसंत करीत. कधी मोहनराव गवंडी यांचे घर असे, तर कधी साठे यांचे घर असे. १९८३ साली त्यांनी ‘सामाजिक समरसता मंचा’ची स्थापना केली. मोहनराव गवंडी मंचाचे अध्यक्ष झाले. १९८३ साली डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तिथी आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे १४ एप्रिलला आली. हा एक अपूर्व योगायोग होता. या योगायोगाचे महत्त्व जाणून दत्तोपंतांनी ‘सामाजिक समरसता मंचा’च्या स्थापनेची घोषणा केली. तेव्हा मी मुंबई महानगरचा सहकार्यवाह झालो होतो.
दत्तोपंतांनी भूमिका मांडली की, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी समाजात बंधुभाव निर्माण होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तत्त्वज्ञानात बंधुतेला फार मोठे स्थान दिले. डॉ. हेडगेवारांनी संघ शाखांच्या माध्यमातून बंधुभाव निर्माण करण्याचे एक तंत्र विकसित केले. दोन महापुरुषांच्या विचारांतील हा एक समान दुवा आहे. या समान दुव्याला मुख्य आधार मानून समरसता मंचाची स्थापना करण्यात आली. ‘समरसतेशिवाय समता अशक्य’, या शीर्षकाची एक पुस्तिका पुढे प्रकाशित झाली. स्थापनेच्या दिवशी दत्तोपंतानी केलेल्या भाषणाची ही पुस्तिका आहे. या स्थापना दिवशी मी पुण्याला उपस्थित नव्हतो. समरसता मंचाचे काम मला करावे लागेल, असे तेव्हा मला वाटले नाही.
मुंबईच्या चेंबूर हायस्कूलमध्ये महाराष्ट्र, गुजरात, विदर्भ, या प्रांतांचा द्वितीय वर्षाचा संघशिक्षा वर्ग होता. या वर्गाचा मी कार्यवाह होतो. हा क्षेत्राचा वर्ग असल्यामुळे दत्तोपंत ठेंगडी यांचा वर्गात तीन दिवसांचा प्रवास होता. या काळात मीदेखील सामाजिक समता, दलित प्रश्न, आंबेडकरी चळवळ यावर लिहायला सुरुवात केली होती. त्यासाठी मी जमेल तसे वाचन करीत होतो. महाराष्ट्रातील प्रचलित शब्द होता समता. ‘समरसता’ हा शब्द नवीन होता. ‘समरसता’ शब्दामागे कोणतीही सामाजिक चळवळ नव्हती. त्याचा अर्थ स्पष्ट करणारी पुस्तकेदेखील नव्हती.
वर्गात संध्याकाळच्या वेळेला संघस्थानावर फेर्या मारताना मी दत्तोपंतांना विचारले, "समता, हा प्रचलित शब्द असताना आपण ‘समरसता’ हा शब्द कशासाठी घेतला?" दत्तोपंतांनी मला त्याचे कोणतेही तात्त्विक उत्तर दिले नाही. रमेशला कोणत्या भाषेत उत्तर दिले असताना त्याच्या शंकेचे समाधान होईल, हे ते उत्तम जाणून होते. ते मला म्हणाले, "रमेश, असे आहे, समता हा शब्द डाव्या विचारसरणीचा शब्द आहे. तो जर आपण घेतला तर आपण त्यांची उष्टावळ चाटतो, असे होईल. आपले वेगळेपण त्यातून व्यक्त होणार नाही. ते व्यक्त करायचे असेल तर ‘समरसता’ हा शब्दप्रयोग करायला पाहिजे. याचा अर्थ आपल्याला सामाजिक समता नको, असे नाही. सामाजिक समता तर आपल्या कार्याचा प्राण आहे. पण ती आणायची असेल आणि टिकवायची असेल तर समरस भावना निर्माण करणे आवश्यक आहे."
दत्तोपंतांचे एवढेच सांगणे मला पुरे होते. न बोलताच दत्तोपंतांनी अनेक गोष्टी सांगितल्या. डाव्यांच्या समतेचा अर्थ काय होतो, याचा अभ्यास कर. समरसतेच्या अर्थाचादेखील अभ्यास कर. आपल्या प्राचीन विचारांत समतेचा अर्थ काय होतो? समरसता ही कशी सांगितली गेली आहे, याचादेखील अभ्यास कर. माझ्या डोक्यात विचारचक्रं फिरू लागली. कुणाचीही पालखी आपल्या खांद्यावर घ्यायची नाही. आपल्याच विचाराची पालखी आपल्या खांद्यावर राहील, प्रारंभी खूप टीका होईल. या चळवळीत असणारे लोक आपल्यावर हसतील, त्याची चिंता करायची नाही. आपण दमदारपणे पुढे जायचे. एवढे सगळे काही दत्तोपंतांनी मला सांगितले नाही, पण न सांगताच त्यांनी जे सांगितले ते असे आहे.
यानंतर समरसता मंचाचा कार्यवाह म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आणि ती मी दत्तोपंतांच्या मार्गाने पार पाडली. ‘मी मनू आणि संघ’ आणि आताच प्रकाशित झालेले ‘समरसतेचा वाटसरू’ ही दोन पुस्तके समरसतेेच्या प्रवासासंबंधीची आहेत. आज समरसता हा विषय संघाने अखिल भारतीय केलेला आहे. समाजातील सर्व क्षेत्रांत समरसता या शब्दाला मान्यता प्राप्त होत चालली आहे. नरसिंह राव सरकार असताना त्यांनी हुबळीला (कोलकाता) जाणार्या गाडीचे नावदेखील ‘समरसता एक्सप्रेस’ ठेवले. दत्तोपंतांचे द्रष्टेपण यात आहे. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे. आपले कार्य ईश्वरी कार्य आहे, हे केवळ बोलण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. ईश्वरी कार्याला मरण नसते आणि अपयश नसते, याची अनुभूती मी माझ्या जीवनामध्ये निरंतर घेत असतो.