मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. महाराष्ट्राचे कारभारी बदलणार की महायुती सत्ता राखणार या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये मिळेल. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती.
लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींदेखील केदारनाथाचे दर्शन घेतले होते. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाआधी मोदी केदारनाथला गेले होते. १९ मे रोजी निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातले मतदान होणार होते. त्याआधी म्हणजेच १८ मे रोजी मोदी केदारनाथला गेले. त्यांनी जवळपास १५ तास एका गुहेत ध्यानधारणा केली. यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपाला ३०३ जागा मिळाल्या.