
राज्यात ६२ हजार ३६६ अंध मतदारांची २३ हजार १०१ मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ३ लाख ९६ हजार ६७३ दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. या दिव्यांग मतदारांमध्ये ३८ हजार ७६३ मूकबधीर, हालचाल करण्यास अक्षम असे व्यंग असलेले १ लाख ७६ हजार ६१५ आणि अन्य स्वरुपाचे १ लाख १८ हजार ९२९ दिव्यांग यांचा समावेश आहे.
राज्यातील ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांपैकी ६५ हजार ४८३ मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ हजार ९५७ मतदान केंद्रावर मूकबधीर, ४२ हजार ९०५ मतदान केंद्रावर हालचाल करण्यास अक्षम असे दिव्यांग आणि २० हजार ४६५ हजार मतदान केंद्रावर अन्य स्वरुपाचे व्यंग असलेल्या मतदारांची नोंद झाली आहे.
या सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतील. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील. दिव्यांग मतदारांना सुलभ निवडणुकीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.