मुंबई शहराशी संलग्न असलेले शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून वसईची ओळख. पश्चिम पट्ट्यातील हिरवाईने नटलेली गावे, समुद्रकिनारे असल्याने स्थानिक आणि भूमिपुत्रांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ. वसई-विरार महापालिकेचे हे क्षेत्र विधानसभेसाठी एकूण अडीच मतदारसंघात विभागले गेले आहे- वसई, नालासोपारा आणि वसई पूर्वेचा अर्धा भाग. यांपैकी वसई मतदारसंघात आगरी, कोळी, भंडारी, वाडवळ, सामवेदी ब्राह्मण या स्थानिकांबरोबर ख्रिस्ती मतदारांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. नुकत्याच ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या मतदार नोंदीनुसार वसई मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख, २ हजार १५२ एवढी आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९९० पासून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व या मतदारसंघावर आहे. बहुजन विकास आघाडीसाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. २००९ मध्ये वसई-विरार महापालिका स्थापन झाल्यानंतर यातून अनेक गावे वगळण्याचा मुद्दा चर्चेत आला. परिसरातील ५२ गावांनी महापालिकेत जाण्यासाठी विरोध केला.
श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी ग्रामस्थांचा रोष हेरून जनआंदोलन समितीची स्थापना आणि २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार नारायण मानकर यांचा १६ हजार, ७९८ मतांनी पराभव केला. मात्र, २०१४ मध्ये हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी दुसऱ्यांदा जनआंदोलनातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पंडित यांचा ३१ हजार मतांनी पराभव केला होता. मागील ३० वर्षांमध्ये २००९ चा अपवाद वगळता पालिकेत बहुजन विकास आघाडीची एकतर्फी सत्ता आहे. ११३ पैकी १०७ नगरसेवक बविआचे आहे. नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांचा ८८ हजार, ५९८ मतांनी विजय झाला. सर्वच विधानसभा क्षेत्रातून भाजपने आघाडी घेतली असली, तरी वसईत मात्र बविआने ११ हजार, ३०९ मतांची आघाडी घेतली. वसईतून बविआला ९६ हजार, ०१० मते मिळाली आणि गावितांना ८४ हजार, ७०१ मते मिळाली. त्यामुळे वसई आजही बविआचाच गड मानला जातो.
शिवसेनेची फलकबाजी
२०१४ मधील पराभवानंतर जनआंदोलनाला प्रभावी नेतृत्व उरले नव्हते. त्याचा फायदा काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सचिव विजय पाटील यांनी घेतला आणि मतदारसंघ पिंजून काढला. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना व लोकांना मदत करत मतदारसंघ चांगलाच बांधला. पाटील यांच्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली. ते काँग्रेसचे संभाव्य उमेदवार होते. त्यांचा प्रचार सुरू असताना काँग्रेसने हा मतदारसंघ बविआला सोडण्याचे संकेत दिले. त्याची कुणकुण लागल्याने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने यापूर्वी ख्रिस्ती समाजातील एका उमेदवाराच्या नावाची चाचपणी केली होती. मात्र, आता विजय पाटील शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे. पाटील यांनी शहरातील विविध समस्या मोठ्या फलकाद्वारे मांडून याला जबाबदार कोण, असा सवाल केला आहे. या निवडणुकीत ‘बविआविरुद्ध शिवसेना’ अशी थेट लढत होणार आहे.
पूरपरिस्थिती सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी
वसई बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असला तरी शहरात वारंवार होणारी पूरपरिस्थिती ही सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी बनली आहे. चुळणे, दिवाणमान, माणिकपूर आदी परिसर जलमय होतो. सखल भागात पावसाळ्यात पाणी भरते. वसई जलमय होत असल्याने विरोधकांनी मागील वर्षापासून विविध आंदोलने करून पालिकेला सळो की पळो करून ठेवले होते. त्याच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना अद्याप सूर्या प्रकल्पाचे पाणी आलेले नाही. पाणी वितरणासाठी जलकुंभ, जलवाहिन्या बांधण्याचे काम युद्धपातळीवर आहे. शहरातील रखडलेला रिंग रूट प्रकल्प आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी, उड्डाण पुलांचे केवळ कागदावर असलेले प्रस्ताव हे मुद्दे बविआला अडचणीचे ठरणार आहे. कचराभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यातच वसईच्या सनसिटी येथील दफनभूमीचा प्रश्न ज्वलंत आहे. निकृष्ट परिवहन सेवा, ठेकेदारांचा घोटाळा, दफनभूमी घोटाळा आदी मुद्दे विरोधकांनी काढले आहे.
वसईत प्रचंड नागरी समस्या आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडविण्यावर भर देणार आहोत. लोकांचा विरोध असतानाही २९ गावे वगळण्याचा मुद्दा न्यायालयात अडकवून ठेवला आहे. लोकांचे न ऐकणारा लोकप्रतिनिधी होता, यावर मी माझ्या प्रचारात भर देणार आहे. माझा प्रचार विधायक असणार आहे.
-विजय पाटील,
उमेदवार, शिवसेना
आम्ही केलेली कामे हीच आमची शक्ती आहे. कुठल्याही क्षुल्लक राजकारणात न पडता आम्ही विविध विकासकामे करत आहोत. वसईतील जनता सूज्ञ आहे. ते विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. पुढील वर्षी वसईत पाणी भरणार नाही, अशा पद्धतीने कामे केली आहेत.
-हितेंद्र ठाकूर,
आमदार, वसई विधानसभा मतदारसंघ
- विश्वनाथ कुडू