कोकणासाठी ५५० कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव : सुरेश प्रभू

15 Jan 2019 20:10:15
 
 

मुंबई : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी जिल्हा नियोजन प्रकल्पाच्या (डीपीपी) दुसऱ्या टप्प्याचे मंगळवारी उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार असून डीपीपी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विकास होऊ शकणारे क्षेत्रे निश्चित केली आहेत.

 

कोकणच्या विकासकामांतून देशाचे सकल उत्पन्न २ ते ३ टक्के वाढवण्याचा उद्देश केंद्र सरकारचा राहणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या या पथदर्शी योजनेत डिपार्टमेंट ऑफ इन्डस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशनने (डीआयपीपी) वाराणसी (उत्तर प्रदेश), मुझफ्फरपूर(बिहार), विशाखापट्णम (आंध्र प्रदेश) आणि सोलन (हिमाचल प्रदेश), रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. कोकणच्या विकासासाठी ५५० कोटीच्या विकासाचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

उड्डाण योजनेतून सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्योगानुकलतेसाठी जिल्हास्तरावर विचार करण्यात यावा, याबाबत जागतिक बँकेला विनंती करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. निवडलेल्या जिल्ह्यातील भौगोलिक ओळख आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असून मराईन प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी आणि अॅग्रीकल्चर प्राईस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सीने निर्यात वाढविण्यासाठी काम सुरू केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0