जगभरात धर्मस्थळांना न्याय मिळाला, रामजन्मभूमीवरच अन्याय का? : इंद्रेशकुमार

12 Jan 2019 22:05:22


 


मुंबई : अमृतसर, व्हॅटिकन, काबा, बुद्धगया अशा जगभरातील सर्व धर्मस्थळांना नेहमीच न्याय मिळत आला आहे मग श्रीरामजन्मभूमीवरच अन्याय का?” असा परखड सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी उपस्थित केला. बोरिवली येथे सुरूअसलेल्या तीन दिवसीय हिंदू आध्यात्मिक सेवा प्रदर्शनात शनिवारी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

 

यावेळी प्रदर्शनाच्या आयोजन समिती अध्यक्ष डॉ. अलका मांडके, ब्रह्मचारी चैतन्य आणि एस्सेल ग्रुपचे अशोक गोएल उपस्थित होते. इंद्रेशकुमार यावेळी म्हणाले की, “हा अन्याय संपवण्याची जबाबदारी देशातील १३० कोटी जनतेवर आहे. श्रीराम अस्तित्वातच नव्हते असे कॉंग्रेसने एका शपथपत्रात म्हटले आहे. आपण अन्याय का सोसायचा? आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात नाही. आम्ही लोकशाहीवादी आणि संविधानप्रेमी आहोत. परंतु, देशातील सर्वांसोबत न्याय झाला पाहिजे, असे आमचे मत आहे. काँग्रेसने हे शपथपत्र रद्द करून जनतेची माफी मागावी. मंदिर बनणे ही कोण एका पक्षाचे यश नसून, त्यामुळे सर्वधर्मियांनाच यश मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्याने हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले, "स्वामी विवेकानंद शिकागो येथे व्याख्यानासाठी गेले असता तेथील उपस्थितांचा उल्लेख त्यांनी बंधु आणि भगिनीअसा केला, तेव्हा टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट झाला. स्त्रियांना भगिनी स्वरूपात पाहणे, ही आपली संस्कृती आहे. अमेरिकेतून परत येताना बोटीतून उतरल्यावर विवेकानंदांनी चक्क जमिनीवर लोळण घेतली होती. भोगवादी वृत्तीच्या देशातून आल्यानंतर स्वतःला आपल्या देशातील मातीच्या स्पर्शाने पवित्र करत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले होते. या संस्कृती आणि पवित्रतेमुळेच भारताची विश्वगुरू ही ओळख आज कायम आहे"

 

स्त्री-सुरक्षेसाठी घरातील मुलांवरही संस्कार हवेत : निवेदिता भिडे

 

या प्रदर्शनात शनिवारी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, “भारतात स्त्रीमुक्तीचा विचार वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. स्त्रीला जगतजननी मानले आहे. ती ९ वर्षांची कन्या असो ८० वर्षांची वृद्धा, तिच्यात मातृत्व आहे. तिच्या मातृत्वाचा सन्मान करण्याचा संस्कार घराघरातून आपल्या संस्कृतीने दिला आहे. संस्कार चांगले असतील तर वेश्याही सुरक्षित असते, मात्र ते नसतील तर घरातील मुलगीही सुरक्षित राहणार नाही. स्त्रीने स्वतःला दुर्गा मानले तर स्वतःचे रक्षण स्वतःच करू शकतो. स्त्रीला कोणतेही पाऊल उचलायचे असेल तर त्यासाठी स्वातंत्र्य आवश्यकच आहे. पण त्या स्वतंत्राचा अर्थ स्वैराचार नव्हे. याचेही भान जपले पाहिजे.शनिवारच्या दिवशी या मेळाव्यात कन्यापूजन आणि आचार्य वंदन कार्यक्रमाचेहीआयोजन करण्यात आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0