राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

05 Sep 2018 21:28:58


 
               
  पुलाच्या पाहणीची कपिल पाटील यांच्याकडून सूचना

भिवंडी : शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी २००६ साली हा पूल बांधण्यात आला होता

 

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील राजीव गांधी उड्डाणपुलाची आयआयटीच्या तज्ज्ञांकडून पाहणी करावी, अशी सुचना भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने पुलाची तातडीने दुरुस्ती करावी. परंतु, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने तज्ज्ञांकडून पाहणी आवश्यक असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

 

राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यानंतर भिवंडीत खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पुलावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर शहरात भीषण वाहतूककोंडी झाली. यापार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर तातडीने अधिकाऱ्याचे पथक भिवंडीत दाखल झाले. खासदार कपिल पाटील, महापौर जावेद दळवी, पोलिस उपायुक्त अंकित गोयल, महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याबरोबर एमएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱ्यानी पुलाची पाहणी केली. “शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने पूल महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने तात्पुरती दुरुस्ती करावी. मात्र, प्रवाशांची सुरक्षिततता लक्षात घेऊन पुलाच्या स्थितीबाबत आयआयटीच्या तज्ज्ञांकडून अहवाल घ्यावा”, अशी सुचना खासदार कपिल पाटील यांनी केली.

Powered By Sangraha 9.0