ब्रिटिशांनी दूर लोटलेल्या वनवासींना कल्याण आश्रमाने जोडले

30 Sep 2018 19:18:08


 

शिर्डी: देशात विविध भाषा, परंपरा आहेत. मात्र विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपत वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले व त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.

 

सदर संमेलनाला अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष जगदेवराम ओराम, मेघालयचे माजी राज्यपाल रंजीत शेखर मुशाहारी, महंत रामगिरी महाराज, श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर लोटलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले व त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला, असेही प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळेच विविध क्रीडा प्रकारात या समाजातील तरुण-तरुणी देशाचे नाव उंचावताना दिसत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आदिवासी समाजाने आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला असून ब्रिटीशांच्या आक्रमणानंतरही त्यांनी आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांच्या काळात आदिवासी बांधवांनी पराक्रम गाजविला. जल, जमीन आणि जंगलाच्या अधिकारासाठी बिहारमधील तिखामाजी, महाराष्ट्रातील बाबुराव शरमाके, बिरसा मुंडा आदींनी अपार साहस दाखवले, असेही कौतुकोद्गार फडणवीस यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमात डॉ. मुशाहिरी, जगदेवराम ओराम, डॉ. सुरेश हावरे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

आदिवासींना या वर्षअखेरपर्यंत वनजमीन पट्टे

 

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, पेसा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून त्यानुसार पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासींना जमीन अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून डिसेंबर अखेरीस जमीन पट्टे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0