भारतीय संघाने 'बांगला टायगर्स'ला लोळवले

22 Sep 2018 13:15:32

 

दुबई : येथे सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली. स्पर्धेतील सुपर-४ सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सर्वच आघाड्यावर बांगलादेशच्या वरचढ ठरला. विशेष म्हणजे जवळपास वर्षभरानंतर एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या ४ खेळाडूंना बाद केले. दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला.

 
सुपर ४ च्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताचे युवा गोलंदाज भुवनेश्वर कुमार अाणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचे सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. यानंतर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युगवेंद्र चाहूल यांनी नेहमीप्रमाणे आपली कामगिरी बजावत बांगलादेशला १७४ धावांवर रोखले. प्रतिउत्तरात खेळपट्टीवर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. रोहित शर्माने नाबाद ८४ धावा केल्या तर शिखर धवनने ४० धावा केल्या. आता भारताचा पुढील सामना २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत होणार असून पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0