मोरबे धरण भरले

26 Jul 2018 20:36:04


 

नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरून वाहू लागल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. गतवर्षी हे धरण २५ ऑगस्ट २०१७ ला भरले होते. यंदा बरोबर १ महिना आधीच धरण भरले. मंगळवारी रात्री ८ पासून बुधवारी पहाटे ३ पर्यंत ७०० दशलक्ष लीटर पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला. पाण्याची चिंता मिटली असली, तरीही पाण्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी रहिवाशांना केले आहे.

पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना मोरबे धरण परिसरातील रहिवाशांना सायरन वाजवून देण्यात आली होती. त्याआधीच त्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता. त्यातच यावर्षी जास्त घनतेने पाऊस पडल्याने २५ जुलैलाच धरण भरले. या धरणातून शहरातील पाणीपुरवठ्यासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असतो.

Powered By Sangraha 9.0