सरकारविरोधात अविश्वास ठरावावर चर्चेला सरकार तयार

18 Jul 2018 12:42:56
 
-
 
 
 
नवी दिल्ली :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी लोकसभेत अविश्वास ठराव मांडला असून सभागृहात विरोधकांकडून हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिली आहे.  २० जुलैला आता यावर पुन्हा एकदा संसदेत चर्चा करण्यात येणार आहे. 
 
 
 
सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातील आंध्रप्रदेशमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. याला विरोधकांनी देखील पाठिंबा दिला. लोकसभा अध्यक्षांनी देखील याला मान्यता दिली, परंतु या प्रस्तावावर तत्काळ निर्णय न घेता  यासाठी वेळ आणि तारीख ठरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय विरोधकांनी देखील मान्य केला आणि यासाठी २० जुलै हा दिवस जाहीर करण्यात आला.
 
 
 
दरम्यान सत्ताधारी पक्षाने देखील लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय मान्य केला आहे. तसेच अविश्वास ठरावावर विरोधकांशी सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली आहे.
 
 
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने गेल्या मार्च महिन्यात केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशला विशिष्ट राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी म्हणून टीडीपी सत्तेतून बाहेर पडला आहे. तसेच भाजपने आपला विश्वासघात केल्याचे मत मांडत, सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे आता या अविश्वास ठरावावर पुढे काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0