शरिया कोर्टवरून भाजप-संघाचे नवे राजकारण : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड

15 Jul 2018 16:30:55

शरिया कोर्टसंबंधी जागरूकतेसाठी देशभर घेणार कार्यशाळा





नवी दिल्ली : शरिया कोर्ट (दारूल कजा) वरून देशभरात सुरु असलेल्या वादावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आज आपले मत मांडले असून 'शरिया कोर्ट' वरून भाजप आणि संघ देशात नवे धार्मिक राजकारण करत असल्याचा आरोप मुस्लीम बोर्डने केला आहे. नवी दिल्ली येथे एक पत्रकार परिषद घेऊन बोर्डच्या सदस्यांनी शरिया कोर्टसंबंधी आपले मत व्यक्त करत, भाजप आणि संघावर आरोप केले आहेत.

शरीया कोर्ट हे न्यायालय नसून यामध्ये फक्त मुस्लिम समुदायातील कौटुंबिक समस्यांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परंतु भाजप आणि संघाने या वरून मात्र एक नवे धार्मिक राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे सध्या बोर्ड अत्यंत जबाबदारीने काम करत असून दारूल कजाविषयी खरी माहिती नागरिकांना देण्यासाठी म्हणून देशपातळीवर यापुढे कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती बोर्डचे सचिव झफरयाब जिलानी यांनी दिली आहे.


याचबरोबर शरीय कोर्ट हे संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात यावे, अशी मागणी लॉ बोर्डने कधीही केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. देशामध्ये ज्याज्या ठिकाणी या कोर्टची जास्त आवश्यकता असेल फक्त त्याच ठिकाणी हे कोर्ट सुरु करण्यात यावेत, अशी आमची भूमिका आहे, असे देखील जिलानी यांनी यावेळी सांगितले. तसेच शरिया कोर्ट हे पूर्णपणे संवैधानिक असून यामुळे देशाच्या एकात्मतेला कसलाही धोका नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0