जिल्ह्यातील रद्द झालेल्या सिंचन विहिरी होणार पूर्ण

11 Jul 2018 09:37:40

रद्द झालेल्या विहिरींचे कामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश




यवतमाळ : सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात खोदण्यात उभारण्यात येणाऱ्या विहिरींपैकी ज्या विहिरींची कामे रद्द झाली होती, ती कामे आता लवकरच पूर्ण होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी नुकतेच नवे आदेश दिले असून सिंचन प्रकल्पाअंतर्गत रद्द झालेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उरलेल्या ८ हजार विहिरींची कामे लवकरच पूर्ण होतील.

नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हायचे पालकमंत्री मदन येरावार आणि सहपालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे १६ हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते. यापैकी आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत रद्द झालेल्या विहिरींना पुन्हा मंजुरी देऊन त्या प्राधान्याने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.


यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांतर्गत सिंचनाखाली क्षेत्र आणण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विहिरींद्वारे सिंचन करण्यास वाव आहे. यासाठी १५० मीटरची मर्यादा सोडून सर्व निकष शिथील करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात विविध योजनांमधून १६ हजार विहिरी मंजूर करण्यात आल्यात. मात्र यातील आठ हजार विहिरी पूर्णत्वास न आल्यामुळे रद्द करण्यात आल्या. या विहिरींसाठी पुन्हा मान्यता घेऊन त्या पूर्ण कराव्यात. शेतकरी त्या पूर्ण करीत नसल्यास इच्छुक शेतकऱ्यांना त्या देण्यात येऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0