स्पीड कॅमेर्‍यांनी बेशिस्त वाहनचालक झाले शिस्तप्रिय

08 Jun 2018 22:14:09



मुंबईः मुंबईतील बेशिस्त वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी वाहतूकविभागाने स्पीड-कॅमेरे लावण्याचा प्रयोग केला होता. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक पोलिसांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या स्पीड कॅमेर्‍यामुळे वेगाची मर्यादा न पाळणार्‍या वाहनचालकांची माहिती वाहतूक पोलिसांना मिळत आहे. त्याच आधारावर वाहतूक पोलिसांनी मे महिन्यामध्ये एक लाख ७७ हजार ई-चलान काढलेले आहेत. पश्चिम आणि पूर्व महामार्गाप्रमाणे, ईस्टर्न फ्री वे आणि वांद्रा-वरळी सागरी सेतूवरही लक्ष ठेवण्यासाठी ४० स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महामार्गावर वेगाची मर्यादा ओलांडून गाडी चालवणार्‍या वाहनधारकावर हे स्पीड कॅमेरे नजर ठेवतात. जर एखादा वाहनधारक वेगाची मर्यादा ओलांडत असेल, तर या कॅमेर्‍याच्या मदतीने त्याच्या वाहनाचा क्रमांक कॅमेर्‍यामध्ये कैद केला जातो आणि त्या वाहनधारकाच्या नावे कारवाईचे ई-चलान काढले जाते. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईमध्ये जवळपास पाच हजार शंभर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ४० स्पीड कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. यामध्ये पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग आणि अन्य महत्त्वाच्या महामार्गांचा समावेश आहे. वाहतुकीसाठी वांद्रा-वरळी सी-लिंक वगळता, सगळीकडे प्रतितास ६० किलोमीटर हा वेगनियम आहे. तर वांद्रा-वरळी सी-लिंकला वेगमर्यादा ही ८० पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ६० पेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणार्‍या वाहनांसाठी या स्पीड कॅमेर्‍याच्या सहाय्याने ई-चलान काढून, वाहनधारकावर कारवाई केली जाते. या स्पीड कॅमेर्‍याच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे सहा हजार चलान काढली जातात.

Powered By Sangraha 9.0