पिण्याचे पाणी जलतरण तलावाला!

14 Jun 2018 10:14:34

मनपा पदाधिकारी, प्रशासनाची अशीही बेपर्वाई 

 
 
जळगाव :
महापालिकेतील सत्ताधारी आणि त्यांच्या सोबतीने प्रशासनाच्या वागण्याला कसलाच धरबंद राहिलेला नसून, दरवर्षी सर्वसामान्यांच्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च करून पिण्यासाठी म्हणून शुध्द केले जाणारे वाघूरचे पाणी चक्क जलतरण तलावाला पुरविले जात आहे. शुध्द पाण्याची ही नासाडी कोणाच्या हौसमौजेसाठी आहे? हा अधिकारांचा गैरवापर नव्हे काय? असे प्रश्‍न विचारले जात आहेत.
 
 
शिरसोली नाक्याजवळील महापालिकेच्या कोकीळ गुरुजी जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात येऊन त्याचे संचालन आणि व्यवस्थापनासाठी ३० जून २०१७ रोजी मक्तेदार मेसर्स एस.जी.एन. कन्स्ट्रक्शन यांच्याशी महापालिकेने करार केला आहे. यात तलाव खुला असण्याची वेळ ते करार रद्द करण्याचा आयुक्तांना असलेला अधिकार आदी विविध प्रकारच्या ६० अटी आणि शर्तींचा समावेश आहे.
 
 
जलतरण तलावासाठी पाण्याची उपलब्धता हा मुख्य प्रश्‍न होता. तलावाची स्वतःची कूपनलिका आहे. मात्र, तिचे पाणी पुरत नाही म्हणून महापालिकेने वाघूर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाणारे पाणी अतिशय उदारपणे या तलावाला उपलब्ध करून दिले आहे. मात्र, जलतरण तलावाचे स्वतःचे शुद्धीकरण संयंत्र असतानाही त्यांना जळगावकरांच्या वाट्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची निकड पदाधिकारी आणि प्रशासन यांना का भासली? यात कुणाचा स्वार्थ होता? जळगावमध्ये आजही अनेक भागात पुरेसा आणि वेळेवर पाणीपुरवठा होत नसतानाही शुद्ध पाण्याची ही नासाडी नव्हे का? ती का केली जात आहे? आदी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. पिण्याच्या पाण्याची नासाडी केल्यास गुन्हे दाखल करण्याचे, तसेच आर्थिक दंड करण्याची धमकी अधून-मधून महापालिका प्रशासन देत असते.
 
 
मक्तेदार सपन झुनझुनवाला यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या माहितीनुसार, पाणी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. बोरिंगचे पाणी पुरत नसल्याने वाघूरचे पाणी घेतो पण यापोटी निर्धारित शुल्कही महापालिकेला अदा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर ललित कोल्हे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही. सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कराराचा भाग असेल तर प्रशासनाने प्रक्रिया न केलेले (रॉ वॉटर) पुरविण्याची व्यवस्था का केली नाही, असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस एकाही नगरसेवकाने करू नये याचेच आश्‍चर्य वाटते. इतरवेळी शहरवासियांच्या हिताच्या गप्पा मारणार्‍या नगरसेवकांना यात कोणते ‘अहित’ दिसते हाही आता संशोधनाचा विषय ठरु शकणार आहे. संबंधितांनी याविषयी विचार करण्याची गरज आहे.
 
महापालिकेने इतरांपासून धडा घ्यायला हवा
शहरात कोकीळ गुरुजी जलतरण तलावाव्यतिरिक्त गणेश कॉलनीत ख्वाजामिया दर्ग्यामागे तसेच केसीई सोसायटीचाही जलतरण तलाव आहेत. गणेश कॉलनीतील तलावाचे व्यवस्थापन मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती आणि नगरसेविका डॉ. वर्षा खडके यांच्याकडे आहे. तेथे विहीर व बोरिंगगमधील पाणी तलावात भरले जाते. त्याचे नियमित फिल्टरेशनही होते. आमच्याकडे महापालिकेकडून पाणी घेतले जात नाही, अशी माहितीही डॉ. खडके यांनी दिली. केसीई सोसायटी पिंप्राळ्यातील खैरनार यांच्या विहिरीतून पाणी विकत घेते. ते टँकरव्दारे आणून सोसायटीचा जलतरण तलाव भरला जातो. त्याचे फिल्टरेशन करून ते वापरले जाते, अशी माहिती डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0