जळगाव :
भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली. येत्या ६ एप्रिल रोजी पक्ष स्थापनेला यशस्वी ३८ वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मुंबई येथे महामेळाव्याचे आयोजन आहे.
या मेळाव्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी नुकतीच मुंबईत केली. या मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील.
मेळाव्याच्या तयारीसाठी राज्यात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विभागात अकरा बैठका झाल्या आहेत. या अनुषंगाने संपूर्ण राज्यात मंडलस्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी रेल्वे, खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार ५ रोजी सकाळी जळगाव आणि भुसावळ येथून सकाळी ४ आणि ५ या वेळेत कार्यकर्ते रेल्वेने जातील.
जिल्ह्यातून ६ ते ७ हजार जाणार आहेत. अशी माहिती भाजपा प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उदय वाघ, जिल्हा महानगर अध्यक्ष आ.सुरेश भोळे, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, मनपातील विरोधी पक्षनेते वामनदादा खडके, मनपा गटनेते सुनील माळी, जिल्हा सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र घुगे पाटील, जि.प.सभापती पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पवार आदी उपस्थित होते.
जनसंघाचे नवे रुप भाजप
आणीबाणीनंतर १९७७ मध्ये देशभरात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशभर निर्माण झालेल्या जनता पक्षाच्या लाटेत उत्तर भारतात कॉंग्रेसचे पूर्णत: पानिपत झाले होते. स्वत: त्या आणि संजय गांधी अनुक्रमे रायबरेली, अमेठीत पराभूत झाले होते, जनता पक्ष सरकारमध्ये तत्कालिन भारतीय जनता संघाचे सर्वाधिक ११० खासदार होते, मात्र संघ-जनसंघाच्या नात्यावर ‘दुहेरी सदस्यत्व’ चा आरोप करुन काही समाजवाद्यांनी रान उठवल्याने ७९-८० मध्ये सरकार कोसळले होते. त्यानंतर १९८० मध्ये अटलजींच्या नेतृत्त्वाखाली जनसंघ समर्थकांनी ‘भारतीय जनता पक्ष’ स्थापन केला.
लोकप्रतिनिधींचा मोठ्या संख्येने सहभाग
या महामेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, खा. रक्षा खडसे, खा. ए.टी.पाटील, आ. स्मिता वाघ, आ.संजय सावकारे, आ. उन्मेश पाटील, आ. चंदुलाल पटेल, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, जि.प अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आ. सुरेश भोळे आदी ५ रोजी मेळाव्यासाठी रवाना होतील.