खासदारांचा पगार कमी करावा : मनोज तिवारी

21 Mar 2018 08:06:03

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होऊन तब्बल २० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे एकही दिवस संसदेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पडलेले नाही, त्यामुळे सभागृहातील खासदारांचा पगार कमी करण्यात यावी अशी मागणी दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे. तिवारी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना अर्ज करून ही मागणी केली आहे.
 
'गेल्या १५ दिवसांमध्ये विरोधकांमुळे एकदाही सभागृहाचे कामकाज व्यवस्थितपणे पार पडलेले नाही. त्यामुळे गदारोळ करणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाजन यांना 'नो वर्क नो पे' हे सूत्र वापरून गदारोळ करणाऱ्या सर्व खासदारांची पगार कमी करावेत अथवा बंद करावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. जेणे करून सर्व खासदार सभागृहाच्या कामकाजात शांतपणे सहभाग घेतील.


याच बरोबर सभागृहात होणाऱ्या गदारोळावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. संसदेचा प्रत्यक्ष क्षण हा अत्यंत मौल्यवान आहे, परंतु विरोध याचा कसलाही विचार न करता. संसदेचा वेळ वाया घालवत आहेत. जनतेने त्यांना ज्या गोष्टीसाठी निवडून दिले आहे. त्याच्या त्यांना सोयीस्करपणे विसर पडला आहे. ही जनतेची फसवणूक असून लोकशाहीमध्ये हा प्रकार होणे अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0