सीआरएमएसच्या शिबिरात समस्यांचे ४ हजार अर्ज

26 Nov 2018 13:49:59

21 दिवसात समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा; डीआरएम - जीएम यांची भेट घेणार


 
भुसावळ : 
 
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध कार्यालयांमधील कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे संपूर्ण विभागात, 20 ते 22 नोव्हेंबर या काळात समस्या निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विभागातील कर्मचार्‍यांनी समस्यांबाबत चार हजार अर्ज सादर केले.
 
 
भुसावळातील विविध कार्यालयांमधून एक हजार तर विभागातून तीन हजार तक्रार अर्ज प्राप्त झाले. या समस्या सोडवण्यासाठी सीआरएमएस पदाधिकारी डीआरएम आणि मध्य रेल्वेचे जीएम यांची भेट घेणार आहेत. 21 दिवसात समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
सीआरएमएसतर्फे भुसावळसह विभागातील इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, बर्‍हाणपूर आणि खंडवा येथे समस्या निवारण शिबीर घेण्यात आले.
 
 
सीआरएमएसच्या 18 शाखांनी कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेत त्या लेखी नोंदवून घेतल्या. संपूर्ण विभागातून आलेल्या समस्यांमध्ये संबंधित कर्मचार्‍यांच्या विभागनिहाय याद्या तयार होणार आहेत.
 
 
तीन दिवसीय समस्या निवारण शिबीरातील समस्या 21 दिवसात दूर न झाल्यास डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. डीआरएम स्तरावर समस्या न सुटल्यास पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळमध्ये रेल्वे जीएम यांची भेट घेणार आहे. कर्मचार्‍यांच्या समस्या रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने मार्गी लावाव्या, या मागणीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
 
 
पीओएचमधील समस्या निवारण शिबिरात वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला होता. कर्मचार्‍यांच्या समस्यांचे निवेदन मुख्य कारखाना प्रबंधकांना देण्यात आले.
 
 
झोनल वर्कशॉप सचिव पी. एन. नारखेडे, मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधिया, मंडळ सचीव एस. बी. पाटील, डी. यु. इंगळे, मेघराज तल्लारे, किशोर कोलते, अभय आखाडे, ईश्वर बाविस्कर, पी. के. जोशी, दीपक तायडे, हरीचंद सरोदे, अजित अमोदकर, विकास सोनवणे, शेख परवेज, स्वप्नील पाटील, सागर विसपुते, सुरेंद्र गांधेले उपस्थित होते. संबंधित कर्मचार्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या - त्या विभागातील वरिष्ठांकडे पाठवल्या जाणार आहेत. संबंधित वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
कर्मचार्‍यांनी मांडल्या समस्या
 
 
तीन दिवसांच्या शिबिरात कर्मचार्‍यांची पदोन्नती रखडणे, बदलीसाठी अर्ज करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होणे, तर ज्यांची बदली झाली आहे त्यांना बदलीच्या ठिकाणी न सोडणे, मृत रेल्वे कर्मचार्‍यांच्या पाल्यांचे नोकरीचे प्रकरण रखडणे, कार्यालयांमध्ये सोयीसुविधा नसणे आदी प्रकारच्या समस्या कर्मचार्‍यांनी मांडल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0