‘अवनी’ मृत्यू चौकशीत समितीत डॉ. कारंथ

16 Nov 2018 20:40:36
 
 

मुंबई : राज्यासह देशभरात गाजत असलेल्या टी-१ अर्थात अवनी वाघिण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती शुक्रवारी या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज, बंगळूरूचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ डॉ. उल्हास कारंथ यांची समितीत नियुक्ती करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याखेरीज, भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडूनचे संशोधक डॉ. पराग निगम यांचीही समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ही समिती सहा तज्ज्ञांची बनली असून यामध्ये वरील अध्यक्ष, सहअध्यक्ष आणि सदस्यांशिवाय डॉ. अनिश अंधेरिया- अध्यक्ष वाईल्ड लाईफ कन्झरवेशन, मुंबई, भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनचे डॉ. बिलाल हबीब यांचा सदस्य म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे. ही समिती टी-१ वाघिणीच्या मृत्यूप्रकरणात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गतच्या तरतूदी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आहे किंवा कसे, याची खातरजमा व तपासणी करणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0