वीरबाला ‘हाली बरफ’ दारिद्रयात

04 Oct 2018 21:03:38
 

शहापूर : तालुक्यातील नांदगावच्या जमना पाड्यातील १५ वर्षीय हाली बरफ हिने न घाबरता बिबट्याच्या तावडीतून आपल्या बहिणीची सुटका केली होती. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हस्ते २०१३ साली हालीलाराष्ट्रीय वीरबाला शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. मात्र, हीच वनवासीपाड्यातील वीरबाला आजही अठराविश्वे दारिद्य्राचे जीवन जगत एका पडक्या झोपडीत राहून आपल्या पतीसह ३ मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करीत आहे. याबाबतची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी त्याची दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे आता प्रशासनाची कानउघडणी केल्यानंतर हालीच्या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले असून तिच्या मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत़.

 

एकीकडे वाघाच्या तावडीतून आपल्या बहिणीची सुटका करणार्या हालीची शौर्यगाथा इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली असली तरी हालीचे जीवन मात्र हालाखीचेच आहे. नांदगाव येथील म्हशीच्या गोठ्यात काम करणार्‍या रघुनाथ आणि काळूबाई बरफ या दाम्पत्याची हाली ही सगळ्यात धाकटी मुलगी. घरची हलाखीची परिस्थिती यामुळे लहानपणापासून मोलमजुरी करून ती आईवडिलांना घर चालविण्यासाठी हातभार लावत असे. यातच शकुंतला बोंडगे या आपल्या मोठ्या बहिणीसोबत जवळच्या अभयारण्यात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता बिबट्याने तिच्या बहिणीवर हल्ला केला, तेव्हा बिबट्याच्या तावडीतून तिने आपल्या बहिणीला वाचवले होते. याची दखल घेत हालीला राष्ट्रीय वीरबाला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र लग्नानंतर हाली आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी २०० रुपये रोजंदारीवर मजुरी करून हलाखीचे जीवन जगत आहे. दरम्यान, विवेक पंडित यांनी ठाणे जिल्हाधिकारी विवेक नार्वेकर यांचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली तर जिल्हाधिकार्‍यांनीही संवेदनशीलपणे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधितांना सूचना दिल्या. अखेर त्वरित हालचाली सुरू झाल्याने तिच्या कुटुंबीयांना शिधापत्रिका सुपूर्द करण्यात आली तर शबरी योजनेतून घरकुल देण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यामुळे आता तरी हालीचे जीवन सुखकर होईल अशी आशा आहे.

 
 

गेली पाच वर्षे हाली प्रशासकीय अनास्थेमुळे अतिशय कष्टप्रद जीवन जगतेय. त्यामुळे आता तरी जीवनावश्यक सुविधा मिळाव्यात, अशी मागणी मी जिल्हाधिकारी विवेक नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना
 

माझी स्थिती अतिशय हलाखीची असून, मी एखाद्या कार्यालयात झाडू मारण्याचे कामही करू शकते फक्त मला शासनाने नोकरी द्यावी. तसेच माझे घर मोडकळीस आले असून घरकुलाची मला गरज आहे. त्यासंबंधी मला मदत मिळाल्यास मी आयुष्यभर ऋणी राहीन.

- हाली बरफ, वीरबाला शौर्य पुरस्कारप्राप्त महिला
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0