बनावट चकमक प्रकरण: ७ अधिकाऱ्यांना जन्मठेप

15 Oct 2018 12:34:28


 

 

गुवाहाटी: २४ वर्षांपूर्वी आसाममध्ये झालेल्या पाच तरुणांच्या बनावट चकमक प्रकरणी लष्करी अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये माजी मेजर जनरल, कर्नल आणि जवानांचा समावेश आहेरविवारी आसाममधील डिब्रूगड जिल्ह्याच्या डिंजन येथील इन्फॅन्ट्री माउंटन विभागात झालेल्या कोर्ट मार्शलमध्ये आर्मी कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

 

या सात दोषींमध्ये मेजर जनरल . के. लाल, कर्नल थॉमस मॅथ्यू, कर्नल आर. एस. सिबिरेन, कॅप्टन दिलीप सिंग, जगदेव सिंग, अलबिंदर सिंग आणि शिवेंदर सिंग यांचा समावेश आहे. ऑल आसाम विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते प्रबीन सोनोवाल, प्रदीप दत्ता, देबाजीत बिस्वास, अखिल सोनोवाल आणि भाबेन मोरन यांच्या हत्या करण्यात आली होती.

 

काय आहे हे प्रकरण?

 

आसाम फ्रंटियर टी लिमिटेडचे जनरल मॅनेजर रामेश्वर सिंह यांची उल्फा दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर लष्कराने ढोला आर्मी कँपमध्ये जणांना ताब्यात घेतले होते. त्यामधील पाच जणांना २३ फेब्रुवारी १९९४ रोजी डांगरी बनावट चकमकीत मारले होते. अन्य चौघांसोबत पाचही विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांना पंजाब रेजिमेंटच्या एका युनिटने १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी १९९४ दरम्यान अटक केली होती.

 

ऑल आसाम विद्यार्थी संघाचे तात्कालीन उपाध्यक्ष आणि भाजपा नेता जगदीश भुयान यांनी बनावट चकमक प्रकरणी गुवाहाटी हाय कोर्टामध्ये आवाज उठवला. त्यानंतर या बनावट चकमक प्रकरणावर सीबीआय तपास झाला. त्यानंतर २४ वर्षांनी या सातही माजी लष्करी अधिकाऱ्यांना दोषी जाहीर करण्यात आले. सर्व दोषी अधिकारी आर्मी कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध आर्म्ड फोर्सेज ट्रिब्यूनलमध्ये, तसेच सुप्रीम कोर्टात दावा करण्याच्या तयारीत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0