
नवरात्रौउत्सवाचा आज अखेरचा दिवस. एकमेकांना आपट्याचे पान देऊन आपण सोनं लुटलं असं म्हणतो. म्हणूनच या दसऱ्याच्या मुहूर्तावरच समाजातील असेच एक व्यक्तिमत्व आज आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. एक नाही दोन नाही हजारहून अधिक महिला कामगारांना ज्यांनी स्वतःचे हक्काचे घर मिळवून दिले आणि तेही प्रचंड माफक दरात. एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला किंवा सरकारलाही सहजरित्या जे काम करता आले नाही ते काम राजश्रीताई नागाने पाटील यांनी गेल्या काही वर्षात करून दाखवले. कसे घडले असेल हे काम आणि या कामात काय अडचणी आल्या, कोणी कोणी कशी मदत केली याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील विस्तृत मुलाखतीतून मिळणार आहे.
प्रश्न : ताई जेव्हा तुम्ही लग्न होऊन पुण्यात आलात तेव्हा इतकं मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर होत का?
राजश्रीताई : अगदी सुरवातीपासून बघितलं तर तशी माझी ग्रामीण पार्श्वभूमीच होती. सांगोला तालुक्यातील मौद हे माझं मुलाचं गावं. लग्नानंतर १९९३ साली आम्ही पुण्यात आलो. त्यावेळी माझे पती कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. माझं स्वतःचही 'बीए' पर्यंतच शिक्षण झालेलं, पण पुढे जाऊन आयुष्यात असं काहीतरी करेन असं आधीपासून वाटलं नव्हतं.
प्रश्न : मग तुम्ही सामाजिक क्षेत्राची कास कशी धरलीत?
राजश्रीताई : लग्नानंतर पती कामाला गेल्यावर घरी मला फारच कंटाळा येत असे. पण पहिलीपासूनच माझा स्वभाव सतत काहीतरी करत राहण्याचा असल्याने वेळ जावा या कारणाने गरिबांच्या मुलांसाठी मी घरगुती क्लासेस सुरु केले. प्रतिसाद चांगला मिळत गेला. पण या काळात मुलांच्या आईशी (घरकाम करणाऱ्या बायका) बोलताना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवू लागली की, प्रत्येकीच्याच घरात काहींना काही समस्या आहेत आणि बऱ्यापैकी समस्या या आर्थिक स्वरूपाच्याच आहेत. याच समस्येवर काहीतरी ठोस उपाय काढण्यासाठी मी सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मग माझ्या डोक्यात बचत गटाची संकल्पना आली आणि मी तातडीने त्यावर अंमलबजावणीही केली. संबंधित महिलांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी या बचत गटाच्या माध्यमातून काम सुरु झाले. पण एक क्षण असा आला कि मला जाणवू लागलं कि या माध्यमातून कर्ज देऊन त्या त्या वेळेसचे निराकरण होते, परंतु कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. यासाठीच रोजगार निर्मिती व कामगार महिलांच्या मुलांचे शिक्षण तसेच आरोग्याच्या खर्चाच्या दृष्टीने २००७ साली ८ बचत गट ८० महिलासह मी 'वैष्णवी महिला उन्नती संस्था' स्थापन केली.
प्रश्न : या सर्व महिलांना घर मिळवून द्यावे असं तुम्हाला केव्हा आणि का वाटलं?
राजश्रीताई : 'वैष्णवी महिला उन्नती संस्थे'च्या अंतर्गत जोमाने काम सुरु होते. कोणी मुलांच्या शिक्षणासाठी, कोणी आरोग्यासाठी वरचे पैसे घेत असतं. पण असं होत असतानाही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली ती म्हणजे महिला याशिवायही अतिरिक्त पैसे घेऊन जायच्या. याचा आम्ही पाठपुरावा केल्यावर त्यांच्या कडून कळाले की हे अतिरिक्त पैसे त्या महिला घर भाडे भरण्यासाठी नेत असत. याच दरम्यान आमच्या महिला गटातील एका महिले बाबत एक घटना घडली. त्या महिलेच्या पतीचे निधन होऊन काही महिनेच झाले होते, आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. अशातच भाड न भरल्यामुळे घरमालकाने तिला कोणतीही पूर्व कल्पना न देता घराच्या बाहेर काढलं. त्या महिलेची अवस्था बघून मी ठरवलं की आपण या अशा कामगार महिलांसाठी घरांचा स्वतंत्र प्रकल्प साकारायचा...
राजश्रीताई यांचा यापुढील प्रेरणादायी व संघर्षमय प्रवास जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ तुम्हाला एकदातरी आवश्य पाहावा लागेल.