राज्य शासनाने शेतकरी हा केंद्र बिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प तयार केला आहे. शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीसाठी पाणी देण्यास शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज केले. धोम बलकवडी प्रकल्पातील पाणी पूजन व उजवा कालव्यामधील अंतिम टप्प्यातील कालव्याच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे होते. अंतिम टप्प्यातील काम हे येत्या ३ ते ४ महिन्यात पूर्ण होईल, असे सांगून जलसंपदा मंत्री पुढे म्हणाले, या कामासाठी निधी पूर्णपणे उपलब्ध झाला आहे. या अंतिम टप्प्यातील कामांवर शासनाचे लक्ष असून हे वेळेत पूर्ण केले जाणार आहे. तसेच राज्यातील इतर अपूर्ण प्रकल्पांसाठीही निधी कमी पडू दिला जाणार नाही.