‘विदर्भासाठी ‘मिहान’ हा आशेचा किरण’

25 Dec 2016 08:42:00

विदर्भ आणि विशेषतः नागपूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘मिहान’ प्रकल्पाबाबत उर्वरित महाराष्ट्रामध्ये फारच कमी माहिती आहे. त्यामुळे ‘मिहान’ ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी अस्तित्वात आली, आकार घेत गेली, याविषयी काय सांगाल?
 
‘मिहान’ प्रकल्पाची कल्पना खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. इंग्रजांच्या काळात ‘कार्गो हब’च्या संकल्पनेचा विचार झाला होता. त्यात नागपूर हे तेव्हाही मध्यवर्ती ठिकाण होतंच. इंग्रज गेल्यावर हा विचार मागे पडला. स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपूर ही राजधानीदेखील राहिली नाही. पुन्हा १९९०च्या सुमारास नागपूरमधील काही लोकांनी ‘कार्गो हब’ची संकल्पना उचलून धरली आणि त्याचा पाठपुरावा केला. ९०च्या दशकाच्या अखेरीस यासाठी एक अहवाल बनविण्यात आला. या अहवालातून असा विचार पुढे आला की, केवळ ‘कार्गो हब’ सद्यस्थितीत आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. मग त्यासोबत ‘बिझनेस हब’ही हवं, ज्यातून उत्पन्नही मिळेल, मालवाहतूक-प्रवासी वाहतूकही वाढेल. तेव्हा ‘सेझ’ची कल्पनाही नवीन होती. त्यामुळे ‘नागपूर कार्गो बिझनेस हब’ला ‘सेझ’ बनविण्याचा निर्णय झाला. २००४-०५ पासून २००७-०८ हा उद्योग, अर्थविश्वातला सुवर्णकाळ होता. यात ‘मिहान’ची घोषणा होताच अर्थातच अनेक उद्योग ‘मिहान’कडे आकर्षित झाले. सर्वत्र ‘मिहान’ची आणि चर्चा आणि कौतुक झालं. विदर्भातल्या रोजगार शोधण्यासाठी मुंबई-पुणे किंवा अन्यत्र जाणार्‍या तरुणांसाठी ‘मिहान’ ही मोठी संधी असणार होती. या प्रक्रियेतून ‘मिहान’ची संकल्पना साकार होऊ लागली.
 
‘मिहान’चं आजचं स्वरूप कसं आहे? एकूण किती जमीन या प्रकल्पाने व्यापली आहे आणि प्रकल्प कोणत्या संस्थांच्या-कंपन्यांच्या अधिकारकक्षेत येतात?
 
‘मिहान’मध्ये मुख्यतः दोन भाग आहेत. एक ‘बिझनेस हब’ आहे आणि एक ‘कार्गो हब’ आहे. ‘बिझनेस हब‘मध्ये ‘सेझ‘ची जागा सुमारे १,३०० हेक्टरच्या आसपास आहे. विमानतळ सुमारे १,४०० हेक्टरमध्ये आहे. शिवाय ‘सेझ‘ बाहेरची जागा ही सुमारे १,००० हेक्टरची आहे. तसेच इंडियन एअरफोर्सच्या ‘गजराज’ प्रोजेक्टसाठी ४०० हेक्टरची जागा आहे. असं हे एकूण क्षेत्रफळ ४,१०० हेक्टरच्या आसपास आहे. सध्या हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. ‘मिहान’ प्रकल्पामध्ये ५१ टक्के शेअर्स ‘एमएडीसी’ अर्थात ‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’ तर ४९ टक्के हे ‘एएआय’ अर्थात ‘एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया’चे आहेत. विमानतळ प्रकल्पाच्या खासगीकरणाचाही प्रस्ताव समोर आला आहे. सुमारे १,५०० कोटींचा हा प्रकल्प असून सहा कंपन्यांनी यात उत्सुकता दर्शविली आहे. खासगीकरण झाल्यास ‘एमएडीसी’ आणि ‘एएआय’चे शेअर्स प्रत्येकी २६ टक्के राहतील.
 
 ‘नागपूरचा चेहरामोहरा बदलणारा प्रकल्प’ असा गाजावाजा झालेला हा प्रकल्प दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेला दिसतो. याची नेमकी कारणं काय सांगाल? आणि तीच परिस्थिती आताही आहे का?
 
‘मिहान‘ला विलंब का झाला याची अनेक कारणं आहेत. यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, २००७-०८ पासून आलेली जागतिक आर्थिक मंदी. ‘सेझ’ आणि त्यातील ‘बिझनेस हब‘च्या भरभराटीवर ‘मिहान‘चं यश अवलंबून आहे. ‘बिझनेस हब‘ यशस्वी करायचं असेल, तर कंपन्या यायला हव्यात. २००८ नंतर बर्‍याच कंपन्यांची पीछेहाट झाली. काही कंपन्यांनी जागा घेऊन, कामं सुरू होऊन पुन्हा माघार घेतली. ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ या तत्त्वानुसार ते स्वाभाविकच आहे. यामुळे काही काळ संपूर्ण प्रकल्पालाच खीळ बसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जमीन अधिग्रहणालाही थोडा विरोध सुरुवातीच्या काळात झाला. मात्र आता त्याला गती आलेली आहे, विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामालाही वेग आला आहे. आज जागतिक मंदी सर्वत्र असली तरी ‘मिहान’मध्ये आजघडीला २५ कंपन्या प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या आहेत. त्यांचा प्रभाव अन्य उद्योगजगतावर पडतो आहे. ‘मिहान‘मध्ये मिळणार्‍या सुविधा, शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन याबाबत चांगला संदेश जाऊ लागला आहे. जुन्या कंपन्यांनाही मुदतवाढ दिल्याने १०-१५ कंपन्या नव्याने सुरू होणार आहेत.

 
‘कार्गो’ आणि ‘बिझनेस हब’साठी नागपूरचा विचार करताना कोणत्या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या गेल्या? आणि ‘कार्गो हब’पेक्षा ‘बिझनेस हब’चीच अधिक चर्चा, गाजावाजा होताना दिसतो. ‘मिहान’मधील ‘कार्गो हब’ची सद्यस्थिती काय?
 
‘बिझनेस हब’मध्ये बाजारपेठेला जास्त रस असल्याने त्याबाबत जास्त चर्चा सुरू असते. पण याचा अर्थ असा नाही की, ‘कार्गो हब‘ची प्रगती मागे पडली आहे. विमानतळाच्या खासगीकरणातून त्याच्या विकासाला, आधुनिकीकरणाला चालना मिळेल. ‘बिझनेस हब’मुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक वाढत जाईल आणि नागपूरचं ‘कार्गो हब’ विकसित होईल. भारताचे नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून येथील हवाई हद्दीतून दररोज ७०० विमानं ये-जा करतात. पण नागपूर मध्यवर्ती स्थान असूनही ही सर्व विमाने नागपूरला थांबत नाहीत. कारण तशा सोयी-सुविधा तिथे नाहीत. ‘कार्गो हब’मुळे ती नागपुरात थांबतील. यामुळे मुंबईवरचा भार हलका होईल. नागपूर हे आधीपासून एक ‘कॉस्मोपॉलिटन’ शहर आहेच. विदर्भात असं ‘बिझनेस’ आणि ‘कार्गो हब’ विकसित झाल्यामुळे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, राज्याबाहेर हैदराबाद आदी शहरांवरचा भार हलका होणार आहे. महाराष्ट्राचा एकूण विस्तार बघता, विदर्भात असं एखादं केंद्र निर्माण होण्याची गरज होतीच व ती ‘मिहान’मुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळेच ‘मिहान’ कार्यान्वित व्हायला विलंब झाला असला, लोकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत असलं तरी विदर्भाच्या लोकांमध्ये मनातून ‘मिहान’ हा एक आशेचा किरण आहे.
 
‘मिहान’मधून आजपर्यंत अपेक्षित तेवढा रोजगार निर्माण झाला नाही, असा आरोप होतो. या आरोपात कितपत तथ्य आहे?
 
‘मिहान’मुळे दीड ते दोन लाख रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा ‘मिहान’च्या सुरुवातीच्या काळातली म्हणजे २००६-०७ मधली. २००६-०७ मध्ये बाजारपेठेचा सुवर्णकाळ सुरू होता. आयटी व इतर क्षेत्रांतही भरभराट होती. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. लोकांच्या अपेक्षा जुन्याच राहिल्या, पण परिस्थिती अधिक वास्तववादी बनली. आयटी कंपन्यांमधील आजचे पगार बघितले, तर ही परिस्थिती आपल्या सहज लक्षात येईल. त्यामुळे रोजगार निर्मितीची अपेक्षा मंदीमुळे पूर्ण झाली नाही, हे जरी खरं असलं तरी आज ‘मिहान’मध्ये आतापर्यंत दहा हजार रोजगार निर्माण झाला आहे. पतंजली किंवा अन्य नव्या कंपन्यांमुळे आणखी २० हजार रोजगार निर्माण होणार आहे.२००६ मधल्या उद्दिष्टाच्या २५ टक्क्यांपर्यंत पोहोचणं येत्या दोन वर्षांत शक्य वाटतंय आणि सध्याच्या परिस्थितीत ही मोठी उपलब्धी आहे, असं मला वाटतं. 
 
२०१४ मध्ये भाजप सरकार आल्यानंतर ‘मिहान’च्या परिस्थितीत बदल झाला आहे का? नव्या सरकारचा ‘मिहान’च्या विकासाबाबतचा दृष्टिकोन आणि त्यादृष्टीने कार्यवाही, याविषयी काय सांगाल.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही नागपूरचे आहेत. त्यांचा मतदारसंघही नागपूर आहे. त्यामुळे या दोघांनीही पदभार स्वीकारल्यापासून विदर्भ, नागपूर आणि ‘मिहान’च्या विकासात विशेष लक्ष घातलं आहे. ‘नागपूर दिल है तो मिहान उसकी धडकन है|’ असं नागपूरमध्ये समीकरण आहे. त्यामुळेच सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न दिसून येतात. नवं सरकार आल्यापासून प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राजकीय इच्छाशक्ती स्पष्टपणे जाणवते. कोणतीही गोष्ट ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ने व्हावी, परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. अनेक नव्या कंपन्या या दोन वर्षांत ‘मिहान’मध्ये दाखल झाल्या असून यामुळे ‘मिहान’बाबत सरकारची सकारात्मक वाटचाल दिसून येते. 
 
आज साधारण एक दशकाच्या वाटचालीनंतर ‘मिहान’कडे तुम्ही कसं बघता? आणि ‘मिहान’च्या भविष्यातील वाटचालीबाबत काय सांगाल?
 
हा प्रकल्प खरंच होईल की नाही, अशी शंका आधी लोकांना वाटत होती, तर आता त्यांना शंका आहे की, यातून खरंच रोजगार निर्माण होईल की नाही. म्हणजे इथपर्यंत आता आपण आलेलो आहोत. भविष्यातील कामगिरीबाबत बोलायचं झालं, तर येत्या पाच वर्षांत ‘कार्गो हब’चा नवीन रनवे होईल. त्यामुळे ‘कार्गो हब’बाबत ठळक कामगिरी स्पष्टपणे दिसून येईल. रिलायन्स, पतंजली, इन्फोसिस या मोठ्या कंपन्या सुरू होतील. त्यातून मोठा रोजगार निर्माण होईल. लोक आज ‘मिहान’बाबत विश्वास व्यक्त करू लागले आहेत, ‘मिहान’ आज एक ‘सीरियस बिझनेस डेस्टिनेशन’ बनविण्यात आपल्याला यश आलेलं आहे. आणखी पाच वर्षांनी लोक हे म्हणू शकतील की, ‘मिहान’ने नागपूर आणि पर्यायाने विदर्भाची शान वाढविली, असा मला विश्वास वाटतो..
Powered By Sangraha 9.0