व्हेंटिलेटर. खरतर व्हेंटिलेटर म्हटलं की अगदी सामान्यांपासून ते उच्चभ्रूवर्गातील सर्वांनाच एकप्रकारची धडकी भरते. याच ‘व्हेंटिलेटर’ भोवती घोंघावणार्या विषयाला घेऊन राजेश मापुसकर यांनी पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केलाय आणि त्याच नावही आहे ‘व्हेंटिलेटर’च. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातील ‘या रे या सारे या गजाननाला आळवण्या...’ हे गाण हिट झाल आहे. या गाण्याचाच संदर्भ घेऊन चित्रपटाबद्दल ‘बघा रे बघा सार्यांनी बघा...’ असं म्हटलं तर अधिकच ठरणार नाही.
हिंदीमध्ये ‘फेरारी की सवारी’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर राजेश मापुसकरांनी आपला मोर्चा थेट मराठी चित्रपटांकडे वळविला आणि त्यातून ‘व्हेंटिलेटर’चा उदय झाला. या चित्रपटातील कलाकार हीच याची मोठी ताकद आहे असे म्हणावे लागेल. एक नाही दोन नाही तर तब्बल सत्तर कलाकारांना घेऊन हा चित्रपट तयार झालाय. यातील डझनभर कलाकार अगदी मात्तबर फळीतले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं ट्युनींग अतिशय जमून आलेलं आहे. व्हेंटिलेटर हा अतिशय गंभीर विषय असला तरी दिग्दर्शकाने त्यांची मांडणी अतिशय खुबीने केली आहे. सुरूवातीला खुमासदार विनोदी शैलीतून सुरू होणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर हळूहळू गंभीर होत अखेरीस अतिशय भावनिक होतो. मापुसकरांच्या या व्हेंटिलेटरने मध्यंतरापूर्वी प्रेक्षकांना हसलेही आणि शेवटाकडे जाताना रडवलेही आहे. पुरेपुर मनोरंजन, दर्जेदार अभिनय, गणेशाप्रतीची श्रद्धा, त्याद्वारे चालणारे राजकारण, भले मोठे कुटुंब, त्यांच्या अडचणी आणि ओतप्रोत वाहणार्या भावना या सर्वांचं मिश्रण म्हणजे ‘व्हेंटिलेटर’! मुलगा आणि वडील यांच्यातील दुरावलेल्या नात्यावर मध्यंतरानंतर चित्रपट अधिक प्रभावीपणे भाष्य करतो. त्याचबरोबर नातेसंबंधाविषयीचे काही संवादही आपल्याला वेगळा संदेश देऊन जातात.
मुंबईत राहणार्या 72 वर्षीय गजानन कामेरकर उर्फ गज्या काकांचा छोटा मेंदू एके दिवशी निकामी होतो. त्याच दरम्यान गणेशोत्सवास सुरूवात होणार असते त्यामुळे मुद्दामुनच त्यांचा मुलगा त्यांना पंचतारांकीत हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतो. मग काय मुंबई, कोल्हापूर आणि कोकणातील कामेरकरांचे नातेवाईक मुंबईकडे धाव घेतात आणि हॉस्पिटलमध्ये एकच झुंबड सुरू होतो. गज्या काकांना भेटायला येणार्या प्रत्येक व्यक्तिला काकांच्या तब्येतीपेक्षा येणार्या गणरायाचीच जास्त चिंता असते. गणेशोत्सवाच्या आधी व्हेंटिलेटर काढायचा की गणेशोत्सवानंतर या व त्या अनुषंगाने घडणार्या घडामोडींचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. पडद्यावर घडणारे प्रसंग आपल्यापैकी बहुतांश जणांनी कधी ना कधी अनुभवलेले असल्याने ते आपसुकच आपलेसे वाटतात आणि त्यातूनच कधी चेहर्यावर हसू उमटते तर कधी डोळे पाणावले जातात. हेच या चित्रपटाचे यश मानावे लागेल.
गज्या काकांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी), त्यांचा पुतण्या राजा (आशुतोष गोवारीकर), आशिष (संजीव शाह) व त्यांचे संख्खे बंधू भाऊ (सतीश आळेकर) यांनी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. या चौघांनीही अभिनयाची उच्च पातळी गाठली आहे. काही सीन्समधून गोवारीकरांनी प्रदिर्घ कालावधीनंतर अभिनयात पुर्नपदार्पण केलं आहे, असं कुठेही जाणवत नाही. अगदी सहज-सोप्या पद्धतीने कोणतेही उसने आवसान न आणता त्यांनी ही भूमिका साकारली आहे. जितेंद्र आणि आळेकर यांनी संवादातून कमी तर आपल्या देहबोली आणि हावभावावरून अधिक प्रभावी अभिनय केलाय. गणपती मंडळाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाचा व भाऊ प्रसन्नाला त्याच्या जन्माची कहाणी सांगतात या दोन्ही सीन्समध्ये जीतूने खणखणीत अभिनय केलाय. असाच बसमधल्या सीनचाही उल्लेख करावा लागेल यामध्ये आळेकरांनी केवळ हावभावावरून कमाल भूमिका वठवली आहे. याशिवाय सुकन्या कुुलकर्णी, निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, विजू खोटे, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, दिपक शिर्के यांच्यासह इतर सहकलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. बोमन इराणी आणि प्रियांका चोप्राचा गेस्ट अॅपिअरन्सही सुखावह आहे. दिग्दर्शकाचं विशेष कौतुक करावसं वाटतं ते म्हणजे ‘व्हेंटिलेटर’वर असणारी व्यक्ती कोण आहे हे त्याने अखेरच्या काही मिनिटांपर्यंत प्रेक्षकांना दाखवलच नाही. प्रेक्षकांची उत्सुकता कशा प्रकारे शिगेला पोहचवायची याची उत्तम जाण मापुसकरांना आहे, याचा अनुभव ‘फेरारी की सवारी’मधूनही आला होता.
सुरूवातीला काही ठिकाणी मात्र चित्रपटाची मांडणी खटकत राहते. ‘व्हेंटिलेटर’वर ठेवलेल्या रूग्णाला भेटायला येणारा प्रत्येक जण (राजा आणि आशिष सोडले तर) आपल्याच विश्वात गुरफटलेला असतो आणि त्यातूनच विनोद निर्मिती करण्यात आली आहे. मध्यंतरापूर्वी विनोद आणि गांभीर्य याचा समतोल साधायला पाहिजे होता, असं मला वाटतं. गज्या काका जाणारच या भावनेतून त्यांची फे्रम करण्यासाठी प्रसन्नाला फोटो अल्बम हॉस्पिटलमध्ये आणून देणे, हॉस्पिटलमध्येच मोठमोठ्यानी प्रॉपर्टीविषयची वाद सुरू होणे आणि संपूर्ण कुटुंबाला डॉक्टरांनी गज्या काकांच्या प्रकृतीची माहिती देणे हे सीन्स मनाला पटत नाहीत. या सीन्स्चा संबंध पुढच्या काही सीन्स्ची असल्याने ते जुळवून आणल्यासारखे भासत राहते.
चित्रपटातील ‘बाबा...थांब ना रे तू बाबा’ व ‘या रे या सारे या’ ही दोन गाणी मस्त जमून आली आहेत. प्रमोशनसाठी प्रियांकाने ‘बाबा’ हे गाणं म्हटलं असलं तरी चित्रपटातील मूळ गाणं मात्र तिच्या आवाजतलं नाहीये. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मापुसकरांनीच लिहीले असल्याने त्यावर त्यांची योग्य पकड जाणवते. काही ठिकाणी अनावश्यक गोष्टींचे लिखाण झाले आहे, पण इतर चांगल्या गोष्टींमुळे ते झाकून जाते. ‘व्हेंटिलेटर’सारख्या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस प्रियांकाने दाखविले आणि तब्बल अठरा वर्षानंतर पुन्हा अभिनय करण्याचा निर्णय गोवारीकरांनी या चित्रपटाच्या माध्यमातून घेतला, यासाठी मला या दोघांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. इमोशन्स्, इंटरटेनमेंट आणि क्लास अॅक्टिंगचा योग बर्याच दिवसांनी ‘व्हेंटिलेटर’च्या माध्यमातून जुळून आला आहे. एकट्या-दुकट्याने नाही तर संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन ‘व्हेंटिलेटर’चा अनुभव एकदा तरी नक्की घ्याच...!