मुंबई : (Legislative Council Election) राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विविध नाट्यमय घडामोडी घडल्या. या सगळ्यात उबाठा गटात बंडखोरीचे सावट पसरल्याने तीन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली. उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी निवडणूकीतून माघार घेतल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाली.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उबाठा गटाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांच्याशी संवाद साधत त्यांना घेऊन रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेतला.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात देवयानी डोनगावकर यांना उबाठा गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनीदेखील अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला. त्यामुळे बाळ माने, देवयानी डोनगावकर आणि कृष्णा डोनगावकर यांच्यावर पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली.(Legislative Council Election)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....